चैत्र महिना म्हणजे रखरखत्या उन्हात एक नव्या बहाराची चाहूल. या महिन्यात पान गळती होऊन नवी चैत्रपालवी मनास आनंद देऊन जाते. महिनाभर लाडक्या माहेरवाशिणीच्या रूपाने चैत्रगौरीचे घरोघरी आगमन होते. पूजेतील अन्नपूर्णा आसनांवर बसवून तिची पूजा केली जाते. तिला नैवेद्य दाखवून जवळच्या सुवासिनींना हळदी कुंकुवासाठी निमंत्रण दिले जाते. अन्नपूर्णा म्हणजेच साक्षात पार्वतीचे रुप असल्याने तिच्या स्वागतास घरातील अंगण सारवून त्यावर रांगोळी काढतात. या वैशिष्टय़पूर्ण रांगोळीला चैत्रांगण असे म्हटले जाते.
51 प्रकारच्या शुभ चिन्हांचा समावेश
सध्याच्या काळात चैत्रांगणाचा साचा पण मिळतो. या चैत्रांगणाच्या रांगोळीमध्ये 51 प्रकारची अशी शुभ चिन्हे असतात. सूर्य-चंद्र, शिव-पार्वती, गणपती, सरस्वती, यशाचे प्रतीक म्हणजे ध्वज, सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे गुढी. माहेरवाशीण घरी येणाचा आनंद दर्शवणारी शंख, पद्म, गदा, चक्र, गोपद्म, ओम, स्वस्तिक, सौभाग्याचे लेणं म्हणजे हळदी-कुंकूवाचा करंडा, फणी, आरसा, सनई, चौघडा, मोरपीस, बासरी याला श्रीराम, विष्णूंचे अवतार मानलेले आहे. ब्रह्मकमळ, ज्ञानकमळ, हे जगत्पिता ब्रह्मदेवाचे स्वरुप, विष्णूचा अवतार म्हणून कासव, तुळशी वृंदावन, गाय, वासरु हे कामधेनूचे प्रतीक. अंबारी घेतलेला हत्ती ऐश्वर्याचे प्रतीक. शंकरातील गळय़ाचा नाग, श्रीराम म्हणजे विष्णू त्यांचे वाहन गरुड काढले जाते. पूर्ण फळे आंबा, केळी, सवाष्णींची ओटी म्हणून खण, नारळ, शिवलिंग, पणती, कलश, रूद्र, उंबर, पिंपळ वृक्ष आणि पाळणा. अशा या हिंदू संस्कृतीचे प्रतीक म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेले चित्रच म्हणजे चैत्रांगण.
रांगोळीतील सुबकपणा मनात जपण्यासारखा
या रांगोळीत असणारे अनेक घटक अगदी आठवण ठेवून काढणे महत्त्वाचे आहे. ज्याची त्याची जागा ठरलेली आहे. तिथल्या तिथेच प्रत्येक घटक हवेत हाच या रांगोळीचा नियम. इतकी मोठी रांगोळी म्हणजे साहजिकच रांगोळीची रेघ ही बारीक असावी लागते. त्यातला सुबकपणा हा पाहण्यासारखा आणि मनात जपण्यासारखाच असतो.