प्रतिनिधी/ बेळगाव
कचरा टाकेल तेथे कचराकुंडी तयार अशी बेळगावची परिस्थिती झाली आहे. बेळगावची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना एका बाजूला मात्र कचऱयाचे ढीग साचत आहेत. यावरून बेळगाव स्मार्ट कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील चौकाचौकात कचरा टाकण्यात येत असून यामुळे सुंदर बेळगाव अस्वच्छ बनत चालले आहे. येथील हेमु कलानी चौकात कचरा टाकण्यात आला असून वर्दळीच्या भागात साचलेला कचरा आरोग्याच्या समस्यांना आमंत्रण देत आहे.
हेमु कलानी चौकात कचरा टाकण्यात आला असून यामुळे येथून ये-जा करणाऱया नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. दररोज घंटागाडीच्या माध्यमातून घराघरांतून कचरा गोळा केला जातो. मात्र, तरीदेखील नागरिकांकडून कचऱयाची उचल झाल्यानंतर मोकळय़ा जागेत कचरा टाकला जातो. दुसऱया दिवशी कचऱयाची उचल होईतोपर्यंत कचरा त्याच ठिकाणी पडून राहत असल्याने शहराचे रुपडे पालटून गेले आहे.
कचऱयावर चरणारी जनावरे, इतरत्र टाकण्यात येणारा कचरा यामुळे सर्वत्र कचराच कचरा असे चित्र दिसून येत आहे. रामलिंगखिंड गल्लीतील चौकात तसेच हेमु कलानी चौकात, मुख्य चौकांच्या ठिकाणी कचऱयाचे ढीग साचत असल्याने कचऱयाची उचल होते. मात्र नागरिकांकडूनच कचऱयात भर घालण्यात येत असून यामुळे नागरिकांनी स्मार्ट बेळगाव स्वच्छ राखण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.