भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादांनी केली तुफान फटकेबाजी
प्रतिनिधी/ सातारा
हे राज्य जे आहे ना ते लोकशाहीचे नाही तर ठोकशाहीचे राज्य झालेले आहे. मग सचिन तेंडुलकरांवर केस दाखल करणार. लता मंगेशकर यांच्यावर केस करण्याची भीती दाखवतात. अमिताभ बच्चन यांच्यावर कारवाई करणार म्हणतात. तुमच्या घरचं राज्य आहे काय? की कायद्याचं राज्य आहे. लोक बघताहेत, बघताहेत, मतदानाची वाट बघत आहेत. इंदिरा गांधी यांनी सुद्धा या देशात 19 महिने आणिबाणी लागु केली होती. खूप अन्याय अत्याचार केले होते. सगळे जेलमध्ये आहेत करुन टाका निवडणूक असे म्हणून निवडणूका घेतल्या आणि पाणीपत झाले. तसेच तुम्ही भ्रमात राहू नका. मुळात तुम्हाला सत्तेसाठी निवडून दिले नव्हते, असे परखड भाष्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. दरम्यान, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही त्यांनी टोला लगावला.
किल्ले अंजिक्यताऱयावर खासदार उदयनराजे यांच्यासोबत पहाणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी गडावर माजी आमदार कांताताई नलावडे, सुनेशा शहा, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, भाजपाचे सांस्कृतिक सेलचे पंकज चव्हाण, विठ्ठल बलशेठवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, नगरसेवक धनंजय जांभळे, नीलेश नलावडे, विक्रम बोराटे, सुनील काळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम भाजपाने हजारो गावात आयोजित केले आहेत. त्यातला हा खूप महत्वाचा कार्यक्रम आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकऱयांचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदूत्वाचा केवढा त्याग केला. त्यांनी अजान स्पर्धा आयोजित केली. टीपू सुलतान जयंती केली. म्हणून भाजपाच्या सांस्कृतिक आघाडीने असा निर्णय घेतला की सर्व जिह्यात शिवगान स्पर्धा घेणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर जेवढी गाणी लिहिली गेली आहेत, ती गायची. असे प्रत्येक जिह्यात स्पर्धा होवून जे पहिले आले त्यांची आज किल्ले अजिंक्यतारा येथे स्पर्धा होती. कोरोनाच्या नावाखाली सगळय़ाला बंदी आहे. त्यांच्यातल्या एका पक्षाचा राज्याचा अध्यक्ष हजारोंच्या संख्येने मिरवणूक काढतो त्याला बंदी नाही. शहराचा अध्यक्ष मिरवणूक काढतो त्याला बंदी नाही. त्यांचा ब्रेन आझाद मैदानावर शेतकऱयांचा मोर्चा काढतो त्याला बंदी नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवगान स्पर्धेला अजिंक्यताऱयावर बंदी. अतिशय चांगली तयारी करुन सुद्धा गडाच्या खाली स्पर्धा घेतली आहे. महाराष्ट्रात हे जे चालले आहे. कोरोनाचे कारण काढायचे अन् अधिवेशन लांबवायचे. कमी दिवसाचे करायचे. खरं कारण सांगा ना. अध्यक्षपदाची निवडणूक आहे आणि तुम्हाला भीती वाटते. खरं कारण सांगा ना पुजा चव्हाणचा विषय निघणार आहे. धनंजय मुंढेचा विषय निघणार आहे. शेतकऱयांच्या कर्जमाफीचा विषय निघणार आहे. नियमित कर्ज भरणाऱयांना पन्नास हजार देणार होते ते मिळाले नाहीत. 70 हजार वीज कनेक्शन तोडली जाणार आहेत. गावोगावी वीज कनेक्शन तोडण्याचे सुरु आहे. त्याला फेस करायला कोणाचे धाडस नाही. त्यामुळे कोरोनाचे कारण दिले जात आहे. कोरोनामध्ये काळजी घेतली पाहिजे. पण आता उलटं गाडं फिरवणार आहात का तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी दर्शनाला राजे असताना आम्हाला कोणी बंदी घालणार नाही. देशामध्ये राजेंच्या वाटेला कोणी जाणार नाही. उदयनराजेंच्यासोबत गडावर आलो आहे.
शिवेंद्रराजे राष्ट्रवादीच्या संपर्कात नाहीत
शिवेंद्रराजेंची राष्ट्रवादीची जवळकी वाढली आहे याबाबत पत्रकारांनी छेडले असता चंद्रकांत दादा म्हणाले, अस काही नाही. जे जे राष्ट्रवादीमध्ये होते वर्षानुवर्षे ते राष्ट्रवादीत होते. राष्ट्रवादीत असल्यामुळे त्यांचे संबंध असतात महाराष्ट्रातली संस्कृती आहे. पार्टीच्यावर येवून आपण ऐकमेकांना भेटले पहिजे. राज्य त्यांचे आहे. त्यांनी पाचवर्ष आम्ही जसं सरकार चालवलं तसं सगळय़ांना समान न्याय दिला होता. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या 20 ते 25 कोटींच्या निधीच्या फाईलीवर सह्या करायचो. तसं होत नसल्याने आमच्या आमदारांना त्यांना भेटावं लागतं. मतदार संघातील कामानिमित्ताने त्यांना भेटावे लागते. शिवेंद्रराजे हे भाजपामध्ये आहेत. त्यांची राष्ट्रवादीची जवळीक वाढलेली नाही. भेटणे तर चालुच असते. मध्ये देवेंद्रजी संजय राऊत यांच्या मुलींच्या साखरपुडय़ाला गेले होते. त्याची तुम्ही बातमी केली होती. ह्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
आता मतांसाठी देश विरोधी कारवाया करणाऱयांनाही संरक्षण मिळते
मास्कबाबत छेडले असता ते म्हणाले, मास्क घातला पाहिजे मी तर डबल घातला आहे. सरकारपेक्षा वर्षभर जे नियम राबवले त्याला नागरिक वैतागले आहेत, असे सांगत पुढे टुलकिट गँगबाबत छेडले असता ते म्हणाले, या देशात आता ओपन डावी मुव्हमेंट चालू आहे. स्लीपर सेल ऍक्टीव्ह झालेले आहेत. त्यांच्याकडून लोकांची डोकी फिरवण्याचे काम सुरु आहेत. सामाजिक माध्यमांचा सहारा घेतात ते. याला महाराष्ट्रात भाजपाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या काळात पूर्ण कंट्रोल केले होते. पाच वर्षाच्या काळात एक नक्षलवादी हल्ला झाला. तोही एसओपी फालो केली नाही म्हणून. पाच वर्षात गडचिरोली, भामरागड, चंद्रपुर येथे नक्षलवादी हल्ले रोखले. भिमा कोरेगावात स्लीपर सेल सगळे मतासांठी देश विरोधात कारवाया करणाऱयांना संरक्षण मिळते आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.