प्रतिनिधी/ बेळगाव
शहरातील हॉटेलमधील कचऱयाची उचल महापालिकेच्यावतीने करण्यात येते. मात्र, या कामात महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी व वाहने गुंतून राहत असल्याने ही जबाबदारी हॉटेल चालकांवर सोपविण्याचा विचार महापालिकेने चालविला आहे. याकरिता शहरातील हॉटेल चालकांची लवकरच बैठक घेऊन सूचना करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
शहरात दररोज अडीचशे टन कचरा जमा होतो. हॉटेलमधील कचऱयाची विल्हेवाट महापालिकेच्यावतीने लावण्यात येते. वास्तविक पाहता महापालिकेच्या नियमानुसार हॉटेलमध्ये निर्माण होणाऱया ओल्या कचऱयाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधित हॉटेल चालकांची आहे. मात्र, कचऱयाची उचल करण्यासाठी महापालिकेला शुल्क देण्यात येत असल्याने कचऱयाची उचल करून त्यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी महापालिकेकडेच देण्यात आली आहे. हॉटेलमधील सर्व प्रकारच्या कचऱयाची उचल करण्यासाठी महापालिकेने दोन वाहनांची व्यवस्था करून त्यावर स्वच्छता कामगारांची नियुक्ती केली आहे. या कामी महापालिकेचे कामगार व वाहने गुंतून राहत असल्याने शहरातील कचऱयाची उचल करण्याच्या कामावर परिणाम होत आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये निर्माण होणाऱया कचऱयावर प्रक्रिया करण्यात यावी किंवा हॉटेल चालकांनीच कचऱयाची विल्हेवाट लावावी, अशी सूचना महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. ही जबाबदारी हॉटेल चालकांवर सोपविण्याच्यादृष्टीने महापालिकेच्या आरोग्य विभागाने विचार चालविला असून, याची अंमलबजावणी करण्यासाठी हॉटेल चालकांची बैठक बोलाविण्यात येणार आहे. येत्या आठवडाभरात हॉटेल चालकांची बैठक आयोजित करून कचरा व्यवस्थापनाबाबत चर्चा करण्यात येणार आहे.