प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्य सरकारने हॉटेल, रेस्टॉरंट सुरु करण्यासंदर्भात आदेश जारी केले असले तरी जिल्हास्तरावर व्यावसायिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाल्याने काही व्यावसायिकांनी आपला उद्योग सुरु केला तर काहींनी तो बंदच ठेवणे पसंत केले आहे.
रत्नागिरी जिह्यात प्रशासनाकडून हॉटेल व रेस्टॉरंट सुरु करण्याविषयी अनुकूल अभिप्राय नसल्यामुळे काही व्यावसायिकांनी ते बंद ठेवले आहे तर काहींनी मात्र ते सुरु ठेवले आहेत. रत्नागिरीतील प्रभा हॉटेल सोमवारी सुरु झाल्याचे ग्राहकांनी सांगितले. त्याचवेळेला शहरातील अन्य काही हॉटेल्स मात्र बंद होती. राज्य सरकारने सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरण, मास्क यांसह अनेक अटी घालून रेस्टॉरंट व हॉटेल सुरु करण्यासाठी परवानगी दिली. तथापि रत्नागिरीत संभ्रमावस्था कायम आहे. वाईन शॉप सुरु करण्याविषयी सरकारने यापूर्वी अनुकूल आदेश दिलेले असताना जिल्हा पातळीवरील प्रशासनाची संभ्रमावस्था लोकांनी पाहिली आहे.