प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत असतानाच रत्नागिरीसह 18 जिह्यांमध्ये गृह विलगीकरण बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. हा निर्णय ग्रामस्तरावर घेतला जात असताना त्यासाठी आवश्यक उपाययोजनांसंदर्भात ग्रामपंचायतींसमोर व त्यांची अंमलबजावणी करणाऱया जिल्हा प्रशासनासमोरही मोठे आव्हान उभे राहिले आहे.
जिह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित आणि त्यामुळे होणाऱया मृत्यूंचे आकडे सातत्याने वाढत आहेत. जिह्यात बुधवारी 3 हजार 400 सक्रिय रुग्ण असून त्यातील तब्बल 1 हजार 300 रुग्ण गृह विलगीकरणामध्ये आहेत. स्वतंत्र व्यवस्था असणारे अनेक नागरिक गृह विलगीकरणाला पसंती देत आहेत. तसेच रुग्णालयांवरील वाढता ताण पाहता लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय देणे प्रशासनालाही उपयुक्त ठरले होते.
दुसऱया लाटेतील बहुतांश रुग्णांकडे गृह विलगीकरणाची सोय उपलब्ध होती. यामुळे असे रुग्ण घरच्या घरीच बरे झाले, ही वस्तूस्थिती आहे. पण आता राज्य सरकारने गृह विलगीकरण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्हय़ातील ग्रामपंचायतींना कोविड केअर सेंटर, क्वारंटाईन सेंटरची निर्मिती नव्याने करावी लागणार आहे. त्यासाठी वेगळे मनुष्यबळ आणि पैशांचीही व्यवस्था करावी लागेल. त्यातच कोविड केअर सेंटर नेमके कोण उभारणार, याचीही स्पष्टता सूचनांमध्ये नाही. पहिल्या लाटेच्या काळातील नागरिकांची मानसिकता आणि या लाटेत असणारी मानसिकता यात फरक आहे. दुसऱया लाटेत अनेक रुग्णांची गृह विलगीकरणाचा पर्याय स्विकारला होता. यामुळे या निर्णयाला ग्रामपंचायती व नागरिकांचाही प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.