ऑनलाईन टीम
बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या यास चक्रीवादळाचा ओडिशा आणि पश्चिम बंगालला मोठा तडाखा बसला. चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल, शुक्रवारी हवाई पाहणी केली. हवाई पाहणीनंतर पंतप्रधानांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ३० मिनिटं उशिरा पोहोचल्या. यावरुन ममता बॅनर्जी यांच्यावर भाजपा नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपा नेत्यांच्या या टिकेचा तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतला.
“३० मिनिटं उशीर झाल्याच्या कथित विलंबावरून इतका गोंधळ? भारतीय सात वर्षांपासून १५ लाख रुपयांची वाट बघताहेत. लोक एटीएमबाहेर तासन् तास वाट बघत आहेत. लशीसाठी अनेक महिन्यांपासून वाट बघत आहेत. कधी कधी थोडी प्रतीक्षा तुम्हीही करा,” असं म्हणत खासदार मोईत्रा यांनी एक ट्विट करत भाजपावर टीकास्त्र डागलं.
‘चक्रीवादळाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अनुपस्थित राहणे हे कृत्य उद्धटपणाचे आणि अविचारी असून मुख्यमंत्र्यांची वर्तणूक हा शिष्टाचार आणि संघराज्यवादावरील आघात आहे,” असं केंद्र सरकारने ममतांनी केलेल्या विलंबावरून म्हटलं होतं. त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही ममतांवर निशाणा साधला होता.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाले. भाजपने सत्ता मिळवण्यासाठी मोठी ताकद लावली. मात्र, अखेर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूलने आपली एकहाती सत्ता कायम राखली. ममता सरकारला सत्तेत येऊन तीन आठवडे उलटत नाही, तोच पुन्हा राजकीय संघर्षाची ठिणगी पडली. काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसचे मंत्री आणि आमदारांना सीबीआयने अटक केली. यावरून ममतांनी केंद्रावर आगपाखड केली होती. यानंतर काल झालेल्या या बैठकीवरुन आता पुन्हा भाजप आणि तृणमूल यांच्यात वाद रंगण्याची चिन्हे आहेत.