विषाणूमधील किंचित म्युटेशनने उपयुक्ततेवर पडणार नाही प्रभाव
कोरोना विषाणूत होत असलेल्या म्युटेशननंतरही लस दीर्घकाळापर्यंत उपयुक्त राहणार आहे. आयसीएमआरचे महासंचालक डॉक्टर बलराम भार्गव यांनी या म्युटेशनला ‘ड्रीफ्ट’ (किरकोळ परिवर्तन) संबोधिले आहे, हे म्युटेशन विषाणूच्या विरोधातील लसीचा प्रभाव कमी करू शकणार नाही. विषाणूचे संक्रमण रोखण्यास लस पूर्णपणे सक्षम राहणार असल्याचे भार्गव यांनी म्हटले आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभीच कोरोनावरील लस उपलब्ध होईल, असे मानले जात आहे. जुलै महिन्यापर्यंत 30 कोटी लोकांपर्यंत लस पोहोचविण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे.
कुठल्याही विषाणूचे म्युटेशन एक सामान्य प्रक्रिया आहे. काळानुसार विषाणूत लहान परिवर्तन दिसून येते. जानेवारीमध्ये पहिल्यांदा अस्तित्व समोर आल्यापासून कोरोना विषाणूमध्ये जगातील विविध देशांमध्ये म्युटेशन दिसून आले आहे. परंतु हे म्युटेशन या विषाणूसाठी तयार केल्या जाणाऱया लसीचा प्रभाव नगण्य करू शकेल एवढे मोठे नाही. वैज्ञानिकांना नव्याने लस निर्मिती करावी लागणार नाही. छोटय़ा-छोटय़ा म्युटेशनने लसीच्या उपयुक्ततेवर कुठलाच फरक पडणार नसल्याचे भार्गव यांनी म्हटले आहे.
कोरोना परिवाराच्या जुन्या विषाणूच्या अध्ययनातून या विषाणूला पूर्णपणे बदलण्यास सुमारे 10 वर्षे लागतात हे स्पष्ट आहे. या म्युटेशनला ‘शिफ्ट’ म्हटले जाते. म्हणजेच नवा विषाणू जुन्या विषाणूपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. जी लस जुन्या विषाणूवर प्रभावी ठरत होती, ती नव्या विषाणूवर प्रभावी ठरणार नाही आणि यासाठी नवी लस विकसित करावी लागणार असल्याचे भार्गव यांनी स्पष्ट केले आहे.
शिफ्ट येण्यास 10 वर्षे
कोरोना परिवाराच्या जुन्या विषाणूच्या स्वरुपानुरुप नव्या कोरोना विषाणूच्या म्युटेशनमध्ये ‘शिफ्ट’ येण्यास 10 वर्षे लागतील, असे वैज्ञानिकांचे मानणे आहे. यातून सध्या कोरोनाच्या नव्या विषाणूसाठी जी लस विकसित केली जात आहे, ती पुढील 10 वर्षापर्यंत उपयुक्त ठरू शकते हे स्पष्ट असल्याचे भार्गव यांनी म्हटले आहे.
निरंतर लढाई : डॉक्टर भार्गव
कोरोना विषाणूत होत असलेल्या म्युटेशनमुळे लवकरच त्याच्या विरोधात विकसित केली जाणारी लस निष्प्रभ ठरण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु डॉक्टर भार्गव यांनी ही भीती फेटाळून लावली आहे. विषाणूच्या विरोधातील लढाई एक निरंतर प्रक्रिया आहे आणि कोरोना विषाणू प्रकरणीही हेच लागू होणार असल्याचे आयसीएमआरच्या वरिष्ठ वैज्ञानिकाने म्हटले आहे. सर्वप्रथम कोरोना विषाणूचा फैलाव रोखणे आवश्यक आहे आणि लसीशिवाय हे शक्य नाही. एकदा विषाणूचा फैलाव रोखल्यावर होत असलेल्या म्युटेशननुसार लस सहजपणे रि-डिझाइन केली जाऊ शकते असेही त्यांनी नमूद केले आहे.