नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई : चकमक सुरूच
वृत्तसंस्था/ नारायणपूर
छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी एका चकमकीत 10 नक्षलवाद्यांना यमसदनी पाठविले असून अनेक नक्षलवादी जखमी झाले आहेत. मृत नक्षलवाद्यांमध्ये 3 महिलांचा समावेश आहे. ही चकमक अद्याप सुरूच असल्याचे समजते. घटनास्थळावरून एके-47 समवेत मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रs तसेच दारूगोळा हस्तगत झाला आहे. जिल्हा राखीव दल (डीआरजी) आणि स्पेशल टास्क फोर्सच्या एका संयुक्त सुरक्षा पथकाने मोहीम राबविली असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
नारायणपूर-कांकेर सीमाक्षेत्राच्या अबूझमाडमध्ये मंगळवारी सकाळपासून डीआरजी आणि एसटीएफच्या जवानांची नक्षलवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. या चकमकीत अनेक नक्षलवादी मारले गेले आहेत. तर सुरक्षा दलांचे सर्व जवान सुरक्षित आहेत, असे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
अबूझमाड क्षेत्रात 50-60 नक्षलवाद्यांचा वावर असल्याचे समजते. त्यांच्या विरोधातील मोहीम सातत्याने सुरू आहे. उन्हाळ्यात नक्षलवादी सुरक्षा दलांना नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न करत असतात. याचमुळे सुरक्षा दलांनी मोहीम हाती घेतली असल्याची माहिती बस्तरचे पोलीस महासंचालक पी. सुंदरराज यांनी दिली आहे.
यापूर्वी 16 एप्रिल रोजी कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 29 नक्षलवादी मारले गेले होते. बस्तर क्षेत्रात सुरक्षा दलांसोबत झालेल्या विविध चकमकींमध्ये चालू वर्षात आतापर्यंत 88 नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे. बस्तर क्षेत्रात नारायणपूर आणि कांकेर समवेत 7 जिल्ह्यांचा समावेश आहे.