कॅनबरा :
दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या दुष्काळग्रस्त क्षेत्रातील पाण्याचा साठा वाचविण्यासाठी 10 हजारांहून अधिक जंगली उंटांना मारले जाणार आहे. अनंगु पीतजंतजतारा यनकुनितज्जतजरा लँडसच्या (एपीवाय) आदिवासींच्या नेत्याने पाण्याच्या अभावाला सामोरे जाणाऱया 10 हजार उंटांना मारण्याचा आदेश दिला आहे.
जंगलात वणवा भडकल्याने वन्यप्राणी पाण्यासाठी घरांमध्ये शिरत असल्याची तक्रार लोकांनी केली आहे. स्थानिकांच्या तक्रारीनंतर आदिवासी नेत्यांनी 10 हजार उंटांना मारण्याचा निर्णय घेतला आहे. हे ऊंट वर्षात 1 टन मिथेनचे उत्सर्जन करत असल्याने जागतिक तापमानवृद्धीवर प्रभाव दिसून येत असल्याचे म्हणत या नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
ऊंट घरात शिरत असल्याने त्रास होऊ लागला आहे. हे ऊंट वातानुकुलन यंत्रणेतील पाणी पिण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा एपीवायच्या संचालक मंडळाचे सदस्य मारिया बेकर यांनी केला आहे. जंगली उंटांची संख्या दर 9 वर्षांनी दुप्पट होते. ऊंट अधिक पाणी पित असल्याने त्यांना मारण्याचा निर्णय घेतल्याचे ऑस्ट्रेलियाच्या ऊंट व्यवस्थापन यंत्रणेने म्हटले आहे.