महामार्ग विभागाची जवळचा पर्यायी मार्ग देण्याची मानसिकता नाही!
प्रतिनिधी/ गुहागर
घुहागर-विजापूर महामार्गावरील मोडकाघर धरणावरील पूल उभारणीचे काम जोरात सुरू आहे. यामुळे गुहागरहन शृंगारतळीला जाण्यासाठी तब्बल 15 किलोमिटरचे जादा अंतर कापावे लागत आहे. याला पर्याय म्हणून वरवेली स्मशनाभूमी येथून तात्पुरता 2 किलोमिटरचा मार्ग वाहनधारकांनी स्वत:हून शोधला आहे, परंतु महामार्ग प्रशासनाकडून पुलाच्या कामाशेजारून जवळचा पर्यायी मार्ग तयार करण्याची कोणतीच मानसिकता दिसत नसल्याने सर्वांच्याच दांडय़ा गुल केल्या आहेत.
गुहागर-विजापूर हा राष्ट्रीय महामार्ग जाहीर झाल्यानंतर गुहागर ते मार्गताम्हानेपर्यंतच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. यामध्येच गेल्या पावसाळय़ात मोडकाघर येथील पूल धोकादायक ठरल्याने तीन महिने पुलावरील मार्ग बंद ठेवण्यात आला होता. यामुळे रानवीमार्गे 15 किलोमिटरचे जादा अंतर कापून जावे लागत होते. एस. टी.मधून प्रवाशांना 15 ते 20 रूपयांचा जादा भूर्दंड पडत होता, परंतु त्यानंतर ग्रामस्थांनीच पुलावरील टाकलेली माती बाजुला करून धोकादायक पुलावरून नेहमीची वाहतूक सुरू केली. पूल बंद पडल्यावर तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी पुलाची पहाणी करून पर्यायी वरवेली येथून जवळचा रस्ता तयार करण्यासाठी 11 लाख रूपये मंजूर करून दिले, परंतु त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नाही.
माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी महामार्ग विभागाला वरवेली येथून पर्यायी मार्गाबरोबर वाकी-पिंपळवट हे जवळचे पर्यायी मार्ग सुचवले होते. त्यावरही कोणती कार्यवाही झाली नाही. आमदार भास्कर जाधव यांनी तर या जुन्या पुलाची डागडुजी करण्याचाही उपाय सुचवला होता. त्याकडेही महामार्ग विभागाने लक्ष दिले नाही, परंतु यावेळी या नवीन पूल उभारणीचे काम 24 एप्रिलपासून सुरू झाले आहे. हा पूल नवीन जागेवर उभारला जात असून पुलासाठी गेले चार दिवस खोदाई सुरू आहे.
महामार्ग विभागाने रस्त्याचे अथवा पुलाचे काम करताना जवळची पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. असे असतानाही महामार्ग विभागाने पर्यायी मार्ग म्हणून रानवीमार्गे 15 किलोमिटरचा वाढीव रस्ता सुचवून काम सुरू केले आहे. महामार्ग विभाग जवळचा पर्यायी मार्ग तयार करण्यास तयार नाही. गुहागरवासियांना ज्याठिकाणी 8 किलोमिटरवर शृंगारतळीत पोहचता येते त्याठिकाणी 25 किलोमिटरचा वळसा घालून जावे लागत आहे. अशावेळी काही दुचाकी व छोटय़ा चारचाकी वाहनांनी वरवेली येथील स्मशनभूमीपासून जंगलातून जाणारा 2 किलोमिटरचा तात्पुरता पर्यायी मार्ग तयार केला आहे. या मार्गामुळे 2 किलोमिटर अंतर जादा पडत आहे, परंतु पाऊस पडल्यावर हा मार्ग पूर्णपणे बंद होणार आहे. यामुळे सध्या शोधलेला पर्यायी मार्ग हा कायमस्वरूपी उपाययोजना म्हणता येणार नाही.
महामार्ग विभागाला गेले वर्षभर पर्यायी मार्गाविषयी माहिती देऊनही कोणतीच कार्यवाही न झाल्याने माजी आमदार व भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्याकडे निवेदन पाठवून येथील जनतेच्या सोयीसाठी महामार्ग विभागाने पर्यायी मार्ग तयार करावा अशी मागणी केली आहे. मात्र महामार्ग विभागाची तशी कोणतीही मानसिकता नसल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.