वार्ताहर /कुडचडे
धडे-सावर्डे येथे काल बुधवारी एका मालवाहू ट्रेनची धडक बसून 15 म्हशी ठार झाल्या. ही घटना मध्यरात्रीनंतर 1.50 वाज्ण्याच्या दरम्यान घडली. दोन म्हशी जखमी झाल्या असून त्यांना जांबावली येथे गोशाळेत पाठविण्यात आले आहे. त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. सुमारे 35 म्हशी व रेड्यांचा कळप रेल्वे रूळावर बसला होता. कुडचडे रेल्वे स्थानकाचे तांत्रिक विभाग प्रभारी मिरज गफर यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, मंगळवारी मध्यरात्रीनंतर 1.50 वाजता मालवाहू ट्रेन कुडचडे रेल्वे स्थानकावरून सुटल्यानंतर धडे-सावर्डे पुलावर पोचली तेव्हा वेग 60 कि. मी. प्रति तास होता. रेल्वे चालकाला अचानक म्हशींचा मोठा कळप रेल्वे रूळावर बसलेला दिसला. म्हशींना हाकलण्यासाठी चालकाने हॉर्न वाजवला आणि इमर्जन्सी ब्रेक लावला. मात्र, ती थांबेपर्यंत 12 म्हशीं थेट मालवाहू चाकाखाली आल्याने ठार झाल्या. पाच म्हशी गंभीर जखमी झाल्या. त्यापैकी तीन म्हशींचा नंतर मृत्यू झाला. दोन म्हशी जांबावली येथील गोशाळेत पाठवून देण्यात आल्या आहेत. संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांना बोलावून रेल्वे रूळ मोकळा केल्यानंतर दोन तास उशिरा मालवाहू ट्रेन पुढे जाण्यास निघाली. काल बुधवारी दुपारी मृत म्हशींना क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढले व परिसर साफ करण्यात आला. धडे-सावर्डे पुलाजवळ ही घटना घडल्याने मृत म्हशीं व रेड्यांना हटविण्यासाठी सुमारे तीन तास लागले. त्यानंतर रेल्वे रूळ वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. धडे-सावर्डे पंचायतीचे पंच सदस्य शशिकांत नाईक यांनी म्हशींच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जमीन उलपब्ध करून दिली. मृत म्हशींना हटविण्यात त्यांनी सहकार्य केले. गफर यांनी पुढे बोलताना सांगितले की, सर्व म्हशींच्या कानावर नोंदणी टॅग लावण्यात आलेला असून रेल्वेच्या झालेल्य नुकसानीची भरपाई मालकाला द्यावी लागणार आहे. मात्र, या अपघातात सापडलेल्या म्हशींवर दावा करण्यास काल उशिरापर्यंत कुणीच पुढे आला नव्हता.