सुटी न मिळाल्याने पायी करत होते प्रवास
वृत्तसंस्था/ ईटानगर
भारत-चीन सीमेनजीक अरुणाचल प्रदेशच्या कुरुंग कुमे जिल्हय़ात 14 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 19 मजुरांपैकी एकाच्या मृत्यूची पुष्टी मिळाली आहे. तर 18 मजुरांबद्दल अद्याप कुठलीच माहिती मिळू शकलेली नाही. हे सर्व मजूर दामिन भागात बीआरओच्या रस्ते प्रकल्पाच्या कामात सहभागी झाले होते.
5 जुलै रोजी सर्व मजूर आसामसाठी रवाना झाले होते आणि तेव्हापासूनच ते बेपत्ता आहेत. स्थानिक प्रशासनानुसार एका मजुराचा मृतदेह कुमी नदीनजीक आढळून आला आहे. तर उर्वरित बेपत्ता मजुरांचा शोध घेतला जात आहे. तसेच बचाव पथकाला संबंधित ठिकाणी पाठविण्यात आले आहे.
हे सर्व मजूर आसाममधील रहिवासी होते आणि ईदनिमित्त स्वतःच्या घरी आसाममध्ये जाऊ इच्छित होते. त्यांनी कंत्राटदारांकडून सुटी मागितली होती, परंतु त्याने नकार दिला होता. यामुळे या मजुरांना पायीच स्वतःच्या घराच्या दिशेने रवाना होण्याचा निर्णय घेतला होता. प्रवासात ते कुरुंग कुमे जिल्हय़ाच्या घनदाट जंगलांमध्ये हरवले हेते.
वाटेत येणारी कुमी नदी ओलांडताना हे मजूर वाहून गेल्याचा संशय बचाव पथकाने व्यक्त केला आहे. परंतु नदीत हे मजूर कधी बुडाले असावेत हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या मजुरांच्या कुटुंबीयांना कुठल्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही. एक आठवडय़ापूर्वी पायीच ते घरासाठी बाहेर पडले होते एवढेच त्यांना माहिती आहे.
ईशान्येत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. अरुणाचल प्रदेशासह आसाम, मिझोराम इत्यादी राज्यांमध्ये मागील काही दिवसांपासून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अरुणाचलमध्ये कुमी नदीची वाढलेली पातळी पाहता मजूर यात बुडाले असावेत अशी भीती व्यक्त होत आहे.