केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे. या सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये रेल्वेसाठीही अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. याअंतर्गत रेल्वे लहान शेतकरी आणि एमएसएमईसाठी नवीन उत्पादने विकसित करणार आहे. याशिवाय, सुरक्षा आणि क्षमता वाढीसाठी वर्ल्ड क्लास टेक्नॉलॉजी शील्ड (कवच) अंतर्गत 2,000 किमीचे रेल्वे नेटवर्क तयार केले जाईल, असे अर्थमंत्र्यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की, रेल्वे देशातील लहान शेतकरी आणि एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) नवीन उत्पादने विकसित करेल. ‘एमएसएमई’ मजबूत करण्यासाठी नवीन योजना सुरू केल्या जातील. त्यासाठी 5 वर्षात 6000 कोटी रुपये दिले जातील, असेही जाहीर करण्यात आले आहे.
100 पीएम गतिशक्ती कार्गो टर्मिनल
निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्पात रेल्वे कनेक्टिव्हिटीबाबत मोठी घोषणा केली आहे. याशिवाय, 100 पीएम गतिशक्ती कार्गो टर्मिनल पुढील 3 वर्षांमध्ये विकसित केले जातील. याशिवाय, मेट्रो यंत्रणा उभारण्यासाठी नवीन पद्धती लागू केल्या जातील.
400 नवीन वंदे भारत गाडय़ा
2022 च्या या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 400 नवीन स्वरुपातील वंदे भारत गाडय़ा पुरविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पुढील 3 वर्षांमध्ये 400 नवीन पिढीच्या वंदे भारत गाडय़ा चांगल्या कार्यक्षमतेने चालवल्या जातील. या गाडय़ांमधून भारतीय रेल्वेला मोठा विस्तार मिळणार आहे. यासोबतच प्रवाशांना प्रवासातही मोठी सोय होणार आहे.