विशेष पोलीस अधिकाऱयाची दहशतवाद्यांकडून हत्या ः गुरुवारी काश्मिरी पंडिताचा घेतला होता जीव
@ वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये 90 च्या दशकात झालेल्या टार्गेट किलिंगचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. जवानांसह काश्मिरी पंडितांनाही दहशतवादी लक्ष्य करत आहेत. शुक्रवारी सकाळी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी विशेष पोलीस अधिकाऱयाची घरात घुसून हत्या केली आहे. काश्मीरमध्ये 24 तासांमध्ये हत्येची ही दुसरी घटना असल्याने खोऱयात तणावाची स्थिती निर्माण झाली असून ठिकठिकाणी निदर्शने होत आहेत.
बडगाममध्ये गुरुवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी चडूरा तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी राहुल भट्ट यांची गोळय़ा घालून हत्या केली आहे. तर शुक्रवारी पुलवामाच्या गुदूरा येथे विशेष पोलीस अधिकारी रियाज अहमद थोकर यांचा दहशतवाद्यांनी जीव घेतला आहे.
राहुल भट्ट यांच्यावर शुक्रवारी सकाळी बनतालाब येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यादरम्यान जम्मूचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुकेश सिंह, विभागीय आयुक्त रमेश कुमार, उपायुक्त अवनी लवासा यांच्यासह मोठय़ा संख्येत लोक उपस्थित होते.
दहशतवाद्यांनी कार्यालयात शिरून राहुल भट्ट कोण अशी विचारणा करत गोळय़ा झाडल्या होत्या. कार्यालयातील एखादा कर्मचारीच दहशतवाद्यांना सामील होता, याचमुळे त्यांना राहुलबद्दल पूर्ण माहिती होती. राहुल हे सातत्याने बदलीची मागणी करत होते. माझ्या पतीच्या मारेकऱयांना दोन दिवसांमध्ये यमसदनी पाठविले जावे असे राहुल यांच्या पत्नी मीनाक्षी यांनी म्हटले आहे.
ठिकठिकाणी निदर्शने
यापूर्वी गुरुवारी रात्री ठिकठिकाणी निदर्शने झाली. काश्मीर पंडितांनी वाहतूक रोखून उपराज्यपाल येईपर्यंत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. पोलीस महानिरीक्षक सुजीत कुमार यांच्याकडून आश्वासन मिळाल्यावर लोकांनी अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शविली.
सुरक्षा मिळेपर्यंत कामावर परतणार नाही
बडगाममध्ये शेखपोरा पंडित कॉलनीनजीक काश्मिरी पंडितांनी निदर्शने केली. जोपर्यंत सुरक्षेचे पूर्ण आश्वासन मिळत नाही तोवर आम्ही कामावर परतणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर शिबिरांमध्ये राहत असलेल्या काश्मिरी पंडितांनी महामार्गावरील वाहतूक रोखून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. अनंतनागमध्ये काश्मिरी पंडित सरकारी कर्मचारी संघाकडूनही निदर्शने करण्यात आली.
काश्मिरी पंडितांसह हिंदू लक्ष्य
काश्मीरमध्ये टार्गेट किलिंग ऑक्टोबरमध्ये सुरू झाले होते. तेथे 5 दिवसांत 7 नागरिक मारले गेले असून यात एक काश्मिरी पंडित, एक शीख आणि एक स्थलांतरित हिंदू सामील आहे. 14 एप्रिल रोजी दहशतवाद्यानी सतीश कुमारची हत्या केली होती. कलम 370 हद्दपार झाल्यापासून 4 काश्मिरी पंडितांसह 14 हिंदू दहशतवादी हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत.