प्रतिनिधी /पणजी
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येबरोबरच बळी जाणाऱयांचीही संख्या वाढू लागली असून मंगळवारी आणखी दोघांचे बळी गेले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या बळींची संख्या 3841 एवढी झाली आहे. त्याचबरोबर गत 24 तासात 112 नवीन रुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात 191 रुग्ण बरे झाले आहेत. सक्रिय रुग्णसंख्या 882 एवढी खाली आली आहे.
कोरोनाच्या चौथ्या लाटेत आतापर्यंत नऊ जणांचे बळी गेले आहेत. मंगळवारी 24 तासात 1305 जणांची चाचणी करण्यात आली होती. त्यातील 112 बाधित सापडले. त्यामधील 7 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर उर्वरितांना गृहविलगीकरण देण्यात आले आहे. राज्यातील आतापर्यंतच्या बाधितांची संख्या 249282 वर पोहोचली आहे तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 244559 वर पोहोचली आहे. बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्क्यांवर पोहोचले आहे.