पाच वर्षांपासून कराची तुरुंगात होते कैद
लाहोर / वृत्तसंस्था
गेल्या पाच वर्षांपासून तुरुंगात असलेल्या 20 भारतीय मच्छिमारांची पाकिस्तानने रविवारी सुटका केली. या मच्छिमारांना जून 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. या सर्वांना पाकिस्तानच्या समुद्र हद्दीत बेकायदेशीरपणे मासेमारी केल्याच्या आरोपाखाली पकडण्यात आले होते. आता सुटकेनंतर त्यांना लाहोरहून वाघा बॉर्डरमार्गे भारतात पाठवले जाईल. सीमारेषेवर त्यांना भारतीय अधिकाऱयांच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या मच्छिमारांना कराचीच्या लांधी भागातील मालीर जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. सरकारच्या आदेशानुसार मच्छिमारांची सुटका करण्यात आल्याचे तुरुंग अधीक्षक मुहम्मद इर्शाद यांनी सांगितले.
सागरी सीमेचे उल्लंघन केल्याबद्दल भारत आणि पाकिस्तान मच्छिमारांना नियमितपणे अटक करतात. भारताचे जवळपास 588 मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहेत. यापैकी आता 20 जणांची सुटका झाल्याने अजूनही 568 मच्छिमार सुटकेच्या प्रतिक्षेत आहेत. पाच महिन्यांपूर्वी पाकिस्तानने 20 भारतीय मच्छिमारांची सुटका केली होती. पाकिस्तानी मच्छिमारदेखील भारतीय तुरुंगात बंद असून त्यांची संख्या सुमारे 620 इतकी आहे.