मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या नेतृत्वाखालील सेनेचे 40 पैकी 22 आमदार लवकरच भाजपमध्ये ( BJP ) प्रवेश करणार असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने आपल्या सामना ( Samna ) या मुखपत्रात केला आहे. आपल्या साप्ताहिक लेखात एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजपने केलेली “तात्पुरती व्यवस्था” असल्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने दावा केला आहे.
सामनामधील रोकठोक या स्तंभात “आता त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा गणवेश केव्हाही उतरवला जाईल हे सर्वांनाच समजले आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिंदे यांच्या गटाने उमेदवार उभा करायला हवा होता. पण भाजपने ते टाळले,” असे म्हटले आहे.
तसेच महाराष्ट्रातील ग्रामपंचायत आणि सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा असून शिंदे गटाचे 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचे सामनामध्ये म्हटले आहे. शिंदे यांनी स्वतःचे व महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले असून राज्य त्यांना माफ करणार नाही, असा दावाही यात करण्यात आला आहे. शिंदे यांचा भाजप त्यांच्या फायद्यासाठी वापर करत राहील असेही सामनामध्ये म्हटले आहे.