बंगालच्या मालदामध्ये योगी आदित्यनाथ कडाडले – तृणमूल काँग्रेसवर शरसंधान
वृत्तसंस्था/ मालदा
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभा घेतली आहे. राज्यात भाजपचे सरकार येताच तृणमूल काँग्रेसचे गुंड गळय़ात फलक अडकवून दयेची भीक मागत फिरतील. बंगालमध्ये जय श्री राम नाऱयावर बंदी घातली जात आहे. राज्यात भाजपची सत्ता आल्यावर 24 तासांत गोहत्येवर बंदी तसेच अवैध कत्तलखाने बंद केले जात असल्याचे योगींनी म्हटले आहे.
बंगालमध्ये केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना लागू करण्यात येत नाहीत. राज्यात आदिशक्ती मातेच्या पुजेवर बंदी घालण्यात येते, गोहत्या केली जात असतानाही ममतांचे सरकार मौन बाळगून असल्याचे योगी यांनी सांगितले आहे.
बंगालमध्ये जय श्री राम हा नारा देण्यावर बंदी आहे. श्री रामाचे नाव घेतल्यावर हल्ले केले जातात. उत्तरप्रदेशातही एका सरकारने रामभक्तांवर गोळय़ा झाडविल्या होत्या, त्यांची काय अवस्था झाली हे ममतादींनी पहावे असे योगींनी म्हटले आहे.
बंगालमध्ये लव्ह जिहाद
मोहर्रम आणि दुर्गापूजा एकत्र आल्यास बंगालमध्ये मोहर्रमच्या धार्मिक क्रियेला अनुमती देण्यात आली, ममता बॅनर्जी यांनी दुर्गा पुजेवर बंदी घातली. तर उत्तरप्रदेशात दुर्गा पुजेवेळी दुर्गा पूजा होणारच असे स्पष्ट केले आहे. जनतेचे रक्षण करण्यास अपयशी ठरणारे सरकार गुन्हे आणि हिंसाचाराबाबत तडजोड करते. पश्चिम बंगालमध्ये लव्ह जिहादचे प्रकार होत असल्याचे योगींनी म्हटले आहे.