प्रतिनिधी / जळगाव :
मुंबईत उद्या होत असलेल्या दसरा मेळाव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी ठाकरे आणि शिंदे गटाने केली आहे. त्यासाठी कार्यकर्ते जमवून मुंबईला नेणे हे दोन्ही गटासमोर आव्हान असले तरी शिंदे गटाने यात बाजी मारली आहे. जळगाव जिल्ह्यातून शिंदे गटाचे पचवीस हजारांवर तर ठाकरे गटाचे जवळपास तीन हजार कार्यकर्ते आज दुपारी मुंबईला रवाना रवाना झाले.
शिवसेना फुटीनंतर प्रथमच दोन्ही गटांचे दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन होत आहे. जळगाव जिल्ह्यातून शिवसेनेचे पाच आमदार फूटून शिंदे गटात सामील झाल्याने शिंदे गटाला विशेष अपेक्षा होत्या. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी चांगलाच जोर लावला. ते जिल्ह्यातून कार्यकर्ते जमवण्यात यशस्वी झाले. 255 एसटी बसेस, 25 ट्रॅव्हल्स आणि हजाराहून अधिक खासगी वाहनातून हे कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आहेत. काही जणांनी रेल्वेने जाणे पसंत केले. पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांच्याकडे 100 बसेस, आमदार चिमणराव पाटील यांच्या पारोळा व एरंडोलसाठी 100 तर चोपडा येथील आमदार लता सोनवणे यांच्याकडे 55 बसेस कार्यकर्त्यांना नेण्यासाठी पाठवल्या होत्या.
अधिक वाचा : गांधींना ब्रिटीशांकडून दरमहा 100 रुपये मिळायचे; भाजप नेत्याचा जावईशोध
मुंबईला जाणाऱ्या कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शिंदे गटाकडून पुरेपूर काळजी घेतली जात आहे. वणी नाशिक येथे थांबून नंतर कार्यकर्ते उद्या मुंबईला पोहचतील असे नियोजन आहे. शिंदे गटाला उत्तर महाराष्ट्राने चांगली साथ दिली असल्याने मोठया प्रमाणावर कार्यकर्ते मुंबईत आणण्याचे नियोजन केले गेले आहे.
तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना शिंदे गटासोबत जा, मुंबईत गेल्यावर मेळाव्यासाठी दादरला या असा सल्ला देखील दिला जात आहे. जिल्ह्यातून ठाकरे गटाचे पाच हजार कार्यकर्ते जाणार असल्याचे सांगितले जात असले तरी तीन हजारापर्यंत कार्यकर्ते जातील की नाही, या बाबत शंका व्यक्त केली गेली आहे.