‘तौक्ते‘ चक्रीवादळ नुकसान भरपाईवर राजन तेली यांची प्रतिक्रिया
प्रतिनिधी / वेंगुर्ले:
तौक्ते चक्रीवादळात सिंधुदुर्गसह कोकणातील घरांची, बागायतीची व अन्य स्वरूपात मोठी नुकसानी झाली आहे, असे असताना केवळ 250 कोटी रुपयांची मदत म्हणजे कोकणच्या जनतेची केलेली ही थट्टाच आहे. त्यामुळे ही तुटपुंजी मदत जाहीर करणाऱया आघाडी शासनाचा भाजपतर्फे निषेध करीत असल्याची परखड प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
गतवर्षी निसर्ग वादळामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई येथील मच्छीमार, व शेतकऱयांना अद्याप मिळालेली नाही. सत्तारुढ पक्षाचे स्थानिक आमदार व पालकमंत्री यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. आता तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीपोठी कोकणासाठी 250 कोटी रुपये मंजूर केले आहेत. येथील आंबा बागायतदार, मच्छीमार यांचे झालेले नुकसान पाहता ही नुकसानभरपाई अत्यंत तुटपुंजी आहे. कोकणात विशेषत: जिल्हय़ात चक्रीवादळामुळे झालेल्या ग्रामस्थांच्या नुकसानीबाबत शासनाची मदत मिळेल तेव्हा मिळेल, पण भाजपकडून तातडीची मदत म्हणून ताडपत्री, पत्रे, कौले, पाण्याच्या प्लास्टिकच्या टाक्मया आदी वस्तू स्वरूपातील मदत भाजपकडून वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. शिवसेना मोठी करण्यासाठी कोकणी माणसाने खूप प्रयत्न केले. मात्र, आज कोकणी माणसावर संकट आले असताना त्यांना मदत करण्यासाठी शिवसेना पुढे आलेली दिसत नाही हे दुर्दैव आहे. पण नुकसान झालेले सर्व नागरिक हे आमच्या कुटुंबातीलच एक भाग आहेत. आणि त्यांना त्यांच्या पायावर पुन्हा एकदा खंबीरपणे उभे राहण्याचे काम भारतीय जनता पक्षातर्फे सुरू असल्याचे राजन तेली यांनी सांगितले.
कोरोनामुळे जिल्हय़ात लोक मरत आहेत. शासनाकडून फक्त घोषणा करण्यात येत आहेत. जिल्हय़ात एकही ऑक्सिजन बेड नाही. जिल्हय़ाची आरोग्य यंत्रणा आज व्हेंटीलेटरवर आहे. येथील रुग्णालयातील नर्सेस, सिक्युरिटी यांचे सहा सात महिने पगार नाहीत. या विरोधात भाजप लवकरच आंदोलनाची भूमिका घेणार आहे. भाजपतर्फे वेंगुर्ले व सावंतवाडी येथे प्रत्येकी 25 ऑक्सिजन बेडची व्यवस्था करुन येथील लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण, जिल्हा सरचिटणिस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगराध्यक्ष राजन गिरप, जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक, नीलेश सामंत, वसंत तांडेल, जयंत मोंडकर, प्रशांत आपटे आदी उपस्थित होते.