पंतप्रधान मोदींचे वक्तव्य : नवे सरकार स्थापन होताच घेणार निर्णय
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्र सरकार आता पश्चिम बंगालमध्ये भ्रष्टाचाऱ्यांकडून ईडीने जप्त केलेल्या सुमारे 3 हजार कोटी रुपयांच्या अवैध संपत्ती आणि रक्कम गरीबांना परत करण्याची तयारी करत आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी बंगालच्या नाया जिल्ह्यातील कृष्णानगर मतदारसंघाच्या भाजप उमेदवार अन् कृष्णानगर राजघराण्याच्या राजमाता अमृता राय यांच्याशी फोनवरून चर्चा करताना याबाबत माहिती दिली आहे. ईडीकडून जप्त रक्कम गरीबांना वाटण्यासंबंधी कायदेशीर मार्ग शोधला जात असल्याचे मोदींनी नमूद पेले आहे.
अमृता राय यांच्याविरोधात तृणमूल काँग्रेसने महुआ मोइत्रा यांना उमेदवारी दिली आहे. बंगालमध्ये भ्रष्टाचाऱ्यांनी गरीबांकडून लुटलेली सुमारे 3 हजार कोटींच्या संपत्ती जप्त केल्या आहेत. याच संपत्ती अन् रक्कम गरीबांना परत करण्याच्या दिशेने काम केले जात आहे. याकरता कायदेशीर सल्लामसलत केली जात आहे. बंगालमध्ये शिक्षक, क्लार्कच्या भरतीसाठी लाचेच्या स्वरुपात गरीबांचा पैसा लुटण्यात आला आहे. आता भ्रष्टाचाऱ्यांच्या जप्त संपत्तीद्वारे गरीबांना त्यांचा पैसा परत करण्यासाठी कायदेशीर पर्यायांवर काम सुरू असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे.
निवडणुकीनंतर नवे सरकार स्थापन होताच ही रक्कम गरीबांना परत करण्यासाठी आवश्यक सर्व पावले उचलली जातील. यात कायदा आणण्याचा पर्याय देखील सामील असल्याचे मोदींनी म्हटले आहे.