किसान सभेच्या अधिवेशनात ठराव; दुधाच्या हमीभावासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर प्रतिनिधी
शेतीमालासह दुधाला हमीभावाचा कायदा तात्काळ लागू करून उत्पादन खर्चाच्या दिडपड हमीभाव द्यावा, आगामी गाळप हंगामात उसाला प्रतिटन एकरकमी चार हजार रुपये दर द्यावा, देवस्थान व इनामी जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांना मालकी हक्क मिळावा, रासायनिक व शेती औषधांचे दर कमी करून शेतीला दिवसा सलग 12 तास वीज पुरवठा करावा, असे महत्वपुर्ण ठराव अखिल भारतीय किसान सभेच्या सातव्या जिल्हा अधिवेशनात सोमवारी करण्यात आले. या ठरावांच्या अंमलबजावणीसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा देखील या अधिवेशनात देण्यात आला. किसान सभेचे राज्याध्यक्ष कॉ. किसन गुजर अध्यक्षस्थानी होते.
राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सोमवारी झालेल्या या अधिवेशनाला मार्गदर्शन करताना अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव कॉ. डॉ. अजित नवले म्हणाले की, केंद्र आणि राज्यातील सरकार शेतकरी विरोधी आहे. चुकीच्या शेती धोरणांमुळेच शेतकरी अर्थीक अडचणीत आला आहे. शेतकऱयांमधील अस्वस्थता समोर आली आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकऱयांच्या या विविध प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी वेळीच गांभिर्य दाखवले नाही. तर शेतकऱ्यांमध्ये उद्रेक निर्माण होवून दोन्ही सरकार विरोधात तीव्र लढा उभारला जाईल.
केंदातील भाजपा सरकारवर टिकास्त्र सोडताना कॉ. नवले यांनी मोदी सरकार हे नाटकी असल्याचे सांगितले. केवळ घोषणा करून शेतकऱ्यांना फायदा नाही तर तोटाच अधिक झाला आहे. उतारा बेस वाढवायचा आणि एफआरपीमध्ये वाढ करायची. म्हणजे एफआरपीमध्ये वाढ करून देखील शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. दूधाला एफआरपी लागू करण्यासाठीही दुर्लक्ष केले जात आहे. पीक विमा कंपन्यांनी वेळेत नुसान भरपाई नाही दिली तर विमा कंपन्यांची कार्यालयेच टार्गेट केली जातील. असा इशाराही त्यांनी दिला. राज्याध्यक्ष कॉ. किसन गुजर, कॉ. उमेश देशमुख, कॉ. आनंदा चव्हाण, प्राचार्य ए.बी.पाटील, दिनकर आदमापूरे, राजेश वरक, नारायण गायकवाड यांचीही भाषणे झाले. अमोल नाईक यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संदेश जाधव यांनी सुत्रसंचालन व आभार मानले. यावेळी अनेक मान्यवर व शेतकरी उपस्थित होते.
सेंद्रीय शेतीतून विषमुक्त अन्न देऊया
या अधिवेशनात नारायण गायकवाड यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतीमालाला दर मिळत नाही. केवळ सत्तेसाठी एकत्र येणारे सर्वच पक्ष शेतकऱयांचा विचार करत नाहीत. रासायनीक शेती घातक ठरत आहे. सेंद्रिय शेतीतून विषमुक्त अन्न लोकांना देवूया. आजची तरुण पिढी शेती व्यवसायात येण्यास तयार नाही. शेतकरी वाचला तरच सगळे वाचणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.