वेळेआधीच करुन दाखविली कामगिरी, पंतप्रधान मोदींकडून कौतुक
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
कोरोना काळात भारतासह जगाची अर्थव्यवस्था मंदावलेली असतानाही भारताने आपले निर्यातीचे लक्ष्य वेळेआधीच पूर्ण केले आहे. गेल्या बुधवारपर्यंत भारताची निर्यात 400 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाली आहे. विद्यमान आर्थिक वर्ष संपण्यास अद्याप आठ दिवस शिल्लक असताना हे ध्येय गाठले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी भारतीय उद्योजकांचे कौतुक केले आहे. भारताने निर्यातीचा 400 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडण्याची ही इतिहासातील प्रथम वेळ आहे.
गेल्या अर्थसंकल्पात आर्थिक वर्ष 2021-2022 साठी 400 अब्ज डॉलर्स (साधारणतः 30 लाख कोटी रुपये) चे निर्यातीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. कोरोनामुळे ते गाठले जाईल की नाही याविषयी साशंकता होती. तथापि, गेल्या बुधवारीच ते गाठण्यात यश आले. हे आर्थिक वर्ष संपेपर्यंत निर्यातीत आणखी किंचितशी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मेक इन इंडियाचे यश
उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी हे यश मेक इन इंडिया या धोरणामुळे मिळल्याचे नमूद केले आहे. हे धोरण पंतप्रधान मोदी यांच्या पुढाकाराने गेली साडेसात वर्षे क्रियान्वित होत आहे. यामुळे भारतात उत्पादनाला चालना मिळाली असून निर्यातक्षम उत्पादने निर्माण करणे हे या धोरणाचे ध्येय आहे.
युद्धाचाही परिणाम नाही
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचाही भारताच्या निर्यातवाढीवर विपरीत परिणाम झालेला नाही. हे युद्ध सुरु असतानाही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये भारताने 25.19 अब्ज डॉलर्सची निर्यात साध्य केली. आर्थिक वर्ष 2020-2021 मध्ये भारताची निर्यात 256.55 अब्ज डॉलर्सची झाली होती. यंदा ही निर्यात तब्बल 46.09 टक्क्यांनी वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या 40 वर्षांमध्ये भारताची निर्यात एका वर्षात इतक्या प्रमाणात वाढलेली नाही. त्यामुळे हा भारतापुरता एक विक्रमच असल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.