कदंब परिवहन महामंडळाचा निर्णय
प्रतिनिधी /पणजी
कदंब परिवहन महामंडळाने 48 इलेक्ट्रीक बसगाडय़ा स्मार्ट सिटी पणजीसाठी वापरण्याचा निर्णय घेतला असून त्या गाडय़ा लवकरच ताफ्यात दाखल होणार आहेत.
महामंडळाच्या संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती व्यवस्थापकीय संचालक डेरीक परेरा नेटो यांनी दिली. त्या संदर्भातील ठराव संचालक मंडळाने मंजूर केला असून त्याबाबतचे पत्र लवकरच इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडला पाठवले जाणार असल्याचे ते म्हणाले. या ई बसगाडय़ा राजधानी पणजीसह पर्वरी व सभोवतालच्या परिसरात वापरण्यात येणार असल्याने त्याचा लाभ विद्यार्थी, नोकरदार अशा सर्वांना होणार आहे.
पावसाळय़ानंतर किंवा डिसेंबर 2022 पर्यंत ई बसगाडय़ा कदंबच्या ताफ्यात सामील होणार असून त्य़ा गाडय़ा जास्तीत जास्त वाढवण्याचा तसेच वापरण्याचा महामंडळाचा प्रयत्न असल्याचे नेटो यांनी नमूद केले. राजधानी पणजीत या ई बसगाडय़ा कुठल्याच मार्गावर धावत नाहीत. पणजीतून त्या इतर ठिकाणी जातात म्हणून पणजी स्मार्ट सिटी उपक्रमात आता त्यांचा समावेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे राजधानीतील धूर व इतर प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.