अन्य तारखा असतात, त्याचप्रमाणे 5 नोव्हेंबर ही देखील आणखी एक तारीख. पण, भारतीय क्रिकेटशी या तारखेचे अनोखे नाते आहे. कारण, हीच तारीख अर्थात 5 नोव्हेंबर ही 3 भारतीय दिग्गज क्रिकेटपटूंसाठी खास ठरली आहे. यातील एका खेळाडूने 5 नोव्हेंबर रोजी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला, एका खेळाडूचा या दिवशी जन्म झाला तर एका खेळाडूची याच दिवशी भारतीय संघात निवड झाली.
5 नोव्हेंबर रोजी विराटने आपला 32 वा जन्मदिवस साजरा केला आणि त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर आरसीबीने पोस्टही केली. पण, याच तारखेला सुनील गावसकर यांनी आपला शेवटचा सामना खेळला होता, याची जुन्या पिढीतील दर्दी क्रिकेट रसिकांनाच अधिक माहिती असावी. याशिवाय, 5 नोव्हेंबर याच दिवशी सचिन तेंडुलकरची भारतीय संघात निवडही झाली होती.
थोडक्यात, 5 नोव्हेंबर 1987 रोजी सुनील गावसकर यांनी आपला शेवटचा सामना खेळला, त्यानंतर, एका वर्षाच्या अंतराने 5 नोव्हेंबर 1988 रोजी विराट कोहलीचा जन्म झाला तर त्यापुढे आणखी एका वर्षाच्या अंतराने 5 नोव्हेंबर 1989 रोजी सचिन तेंडुलकरची भारतीय संघात वर्णी लागली होती.
सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर व विराट कोहली हे जुन्या-नव्या पिढीतील क्रिकेट रसिकांसाठी अक्षरशः गळय़ातील ताईत राहिले आहेत. सचिनला सुनील गावसकरांचा आदर राहिला आहे तर विराटला सचिनचा आदर राहिला आहे. यातील विशेष बाब म्हणजे सुनील गावसकर व सचिन तेंडुलकर हे दोघेही विराट कोहलीच्या फलंदाजीचे प्रशंसक आहेत. या तिन्ही खेळाडूंनी आपापल्या कारकिर्दीत भारतीय क्रिकेटसाठी उत्तम योगदानाची परंपरा सांभाळली आहे आणि सध्या खेळत असणारा विराट कोहली नवनवी माईलस्टोन्स सर करत आहे.