कर्नाटक सरकारचा निधी देताना दुजाभाव स्पष्ट : आमदार अंजली निंबाळकरांचा आरोप
खानापूर : खानापूर तालुक्यात मागीलवर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून 5 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रस्ता, शाळा, पूल, तलावाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. 2022 साली झालेल्या अतिवृष्टीत तालुक्यातील बऱ्याच रस्त्यांचे व शाळा इमारतीचे, तलावाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासाठी आमदार अंजली निंबाळकर यांनी 43 कोटीच्या निधीची मागणी करून सरकारकडे आराखडा सादर केला होता. मात्र शासनाने यावेळीही खानापूर तालुक्यासाठी निधी देताना आपला हात आखडता घेतल्याचे यावेळी आमदार अंजली निंबाळकर यांनी सांगितले. तालुक्यात पावसाचे प्रमाण पाहता झालेले नुकसान मोठ्या स्वरुपात होते. मी तालुक्याची आमदार या नात्याने शासनाकडे अतिवृष्टी निधीतून तालुक्यातील बरीच कामे शासनाकडे मंजुरीसाठी ठेवली होती. याचा सातत्याने पाठपुरावाही केला होता. मात्र निर्दयी सरकारने यावेळीही निधी अत्यल्प मंजूर केला आहे. यामुळे नुकसान झालेल्या ठिकाणचा विकास रखडणार आहे. मात्र मी प्रामाणिकपणे पाठपुरावा केला आहे.
विकासकामात राजकारण न करताना रामगुरवाडी रस्त्यासाठी 80 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे रामगुरवाडी गावच्या रस्त्याची समस्या कायमस्वरुपी सुटणार आहे. या मंजूर झालेल्या कामांचा तातडीने निविदा मंजूर होऊन कामाला सुरुवात करण्यात येणार आहे, असे आमदार अंजली निंबाळकर यांनी सांगितले.
तालुक्यासाठी मंजूर झालेला निधी
गांधीनगर कन्नड शाळेसाठी 26 लाख 50 हजार, कारलगा मराठी शाळा 3 लाख, हत्तरगुंजी मराठी शाळा 2 लाख, देवाचीहट्टी मराठी मुलांची शाळा 1 लाख 50 हजार, हिरेहट्टीवळी कन्नड हायर प्रायमरी स्कूल 5 लाख, कुटीन्होनगर कन्नड प्राथमिक शाळा 1 लाख 15 हजार, जांबोटी मराठी हायर प्रायमरी स्कूल 4 लाख, गोदगेरी पाण्याच्या तलाव दुरुस्तीसाठी 4 लाख, हेब्बाळ पाण्याचा तलाव दुरुस्ती 4 लाख, हेम्माडगा गावातील सी. सी. रोड 10 लाख, नागुर्डावाडा सी. सी. रस्ता 20 लाख, रामगुरवाडी क्रॉस ते गोकुळनगर 80 लाख, ओलमणी ते दारोळी रस्त्यासाठी 30 लाख, मळव संपर्क रस्ता 40 लाख, हलशी ते इंदिरानगर 40 लाख, कामशिनकोप संपर्क रस्ता 35 लाख, निडगल संपर्क रस्ता 30 लाख, तिर्थकुंडये ते तालुका हद्दीपर्यंत 80 लाख, जांबोटी ग्राम पंचायत कार्यलयापर्यंत रस्ता 30 लाख, सीसी रोड हलकर्णी आझादनगर 34 लाख 75 हजार, कान्सुली-ओत्तोळी रस्त्यावरील सीडीसाठी 20 लाख रु., असा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व कामांची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन लवकरच कामाला सरुवात करण्यात येणार आहे. रामगुरवाडी गावचा संपर्क रस्ता अवघ्या दोन महिन्यात उखडला गेला होता. त्यामुळे गावकऱ्यांनी संतप्त होऊन या कंत्राटदाराविरोधात आंदोलन केले होते. तसेच तालुक्यातील सर्वच राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी केली होती. तशा आशयाचे मोठे फलकही गावच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आले होते. गावकऱ्यांनी रस्त्याच्या कामासाठी वरिष्ठ पातळीपर्यंत निवेदन दिले होते. आमदार निंबाळकर यांनी यापूर्वीच पूर निधीच्या आराखड्यात या रामगुरवाडी रस्त्यासाठी निधीची मागणी केली होती. या मागणीची पूर्तता झालेल्या या रस्त्यासाठी 80 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून रामगुरवाडी नाक्यापासून ते गोकुळनगरपर्यंतचा रस्ता करण्यात येणार आहे.