दफन करण्यासाठी कमी पडतेय जागा
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानच्या बाडमेर जिल्हय़ात पशूपालकांसमोर संकट उभे ठाकले आहे. मागील 24 तासांमध्ये तेथे सुमारे 500 गायींचा मृत्यू विषाणू संक्रमणामुळे झाला आहे. या मृत गायींना दफन करण्यासाठी आता तेथे जागा कमी पडू लागल्याचे चित्र आहे. बिघडत चाललेली स्थिती पाहता राज्यातील अशोक गेहलोत सरकारने तातडीची बैठक घेत महत्त्वाची पावले उचलली आहेत.
लम्पी त्वचारोग झालयावर गायींच्या शरीरावर गाठी तयार होऊ लागतात, त्यांना मोठा ताप (ज्वर) येतो, डोके अन् गळय़ाच्या हिस्स्यांमध्ये मोठी वेदना होऊ लागते. यादरम्यान गायींमध्ये दूध देण्याची क्षमता कमी होते तर गंभीर स्थितींमध्ये या गायींचा मृत्यू ओढवत असल्याची माहिती भारतीय पशू चिकित्सा संशोधन संस्थेच्या पदाधिकाऱयाने दिली आहे.
या संक्रमणावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जातोय. 25 हून अधिक पथके प्रभावितभागांमध्ये सर्वेक्षण करत पीडित गोवंशावर उपचार करत आहेत अशी माहिती बाडमेरचे जिल्हाधिकारी लोकबंधू यांनी दिली आहे. आतापर्यंत जिल्हय़ात 80 हजार गोवंशाचे सर्वेक्षण झाले असून यातील 16 हजार गोवंश लम्पी त्वचारोगाने पीडित आहे. बाडमेरमध्ये 10 लाखाच्या आसपास गाय आणि अन्य गोवंशाची संख्या आहे. म्हणजेच आतापर्यंत केवळ 8 टक्क्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.