बाधीतांची एकूण संख्या 1130, 17 जण कोरोनामुक्त
प्रतिनिधी/ रत्नागिरी
गुरूवार सायंकाळपासूनच्या 24 तासात जिल्हय़ात 60 नवे रुग्ण आढळल्याने पॉझिटिव रुग्णांची संख्या 1130 झाली आहे. यामध्ये गुहागरातील चिखली या एकाच गावातील 24 जणांचा समावेश आहे. दरम्यान, चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोना बळींची एकूण संख्या 40 झाली आहे. दरम्यान, जिल्हय़ात ऍन्टीजेन टेस्टला सुरुवात झाली असून यामध्ये एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शुक्रवारी 17 रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची 682 झाली आहे. डिस्चार्ज मिळालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय येथून 1, कोव्हिड केअर सेंटर घरडा, लवेल येथून 12 आणि समाजकल्याण रत्नागिरीमधील चौघांचा समावेश आहे.
शुक्रवार सायंकाळपर्यत सापडलेल्या 60 नव्या रूग्णांमध्ये जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी- 11 , उपजिल्हा रुग्णालय कामथे – 18, गुहागर – 26, दापोली – 3 व घरडा खेड येथील एका रूग्णाचा समावेश आहे. गुहागरमध्ये सापडलेल्या 26 पैकी 24 रूग्ण चिखली या गावातील असून शृंगारतळीत पुन्हा 2 रूग्ण सापडले आहेत.
कोरोनाबळींची संख्या 40
अनावली, संगमेश्वर येथील 58 वर्षीय रूग्णाचा शुक्रवारी जिल्हा रूग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याला मधुमेहचाही आजार होता. त्याचबरोबर चिपळूण येथील एका 57 वर्षीय रुग्णाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बाधित मृत्यूंची संख्या 40 झाली आहे.
357 अहवाल प्रलंबीत
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 13 हजार 177 नमुने तपासण्यात आले आहेत. यातील 1130 अहवाल पॉजिटीव्ह तर 11 हजार 727 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. आणखी 357 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
चिखलीत एकाच कुटुंबातील 32 बाधीत
गुहागर तालुक्यातील बाधीतांच्या संपर्कातील 61 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यातील 26 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामध्ये चिखली येथील 24, तर शृंगारतळीतील 2 आहेत. चिखलीमध्ये वेगवेगळी घरे असलेल्या, परंतु एकाच कुटुंबातील बाधीतांची संख्या 32 तर या कुटुंबामध्ये कामाला येणाऱया दोघांनाही लागण झाल्याने चिखलीतील बाधितांची संख्या 34 झाली आहे. यामुळे चिखली एक किलोमिटर परिसर सील करण्यात आला आहे.
तालुक्यातील एकूण कोरोना रूग्णसंख्या 73 वर पोहचली आहे. यातील दोघांचा मृत्यू तर 22 बरे होऊन घरी परतले असून 49 उपचाराखाली आहेत. चिखली व शृंगारतळी हॉटस्पॉट ठरल्याने ही दोन्ही ठिकाणे लॉकडाऊन करण्यात आली आहेत. पेवे येथील सापडलेल्या 1 रूग्णामुळे गावात कितीजणांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे याकडे लक्ष लागले आहे. अजून सुमारे 25 स्वॅबच्या अहवालांची प्रतीक्षा आहे.
चौकट…
चिपळुणातील मृत्यू हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप
चिपळूण शहरातील उक्ताड येथील 50 वर्षिय विमा प्रतिनिधीचा कोरोनामुळे झालेल्या मृत्यूला आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा कारणीभुत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. कामथे रूग्णालयात झालेल्या कोरोना चाचणीचा अहवाल आठवडाभर न आल्याने उपचारास विलंब झाल्यानेच त्यांचा बळी गेल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
एका सामाजिक संस्थेचा पदाधिकारी असलेल्या या व्यक्तीची 6 जुलै रोजी कामथे रूग्णालयात स्वॅब देण्यात आले होते. मात्र सहा दिवसांनंतरही अहवाल न मिळाल्याने विचारणा केली असता समाधानाकारक उत्तर मिळाले नाही. दरम्यान रूग्णाला अस्वस्थ वाटू लागल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांकडे संपर्क साधल्यानंतर कामथे येथे दाखल करून घेण्यात आले. मात्र तेथे प्राणवायूची व्यवस्था नसल्याने 13 जुलै रोजी जिल्हा रूग्णालयात हलावण्यात आले. मात्र, चारच दिवसात त्यांचा मृत्यू झाला. अहवाल मिळून उपचार वेळेवर सुरू झाले असते तर ही वेळ आली नसती असे सांगत नातेवाईकांनी चौकशीची मागणी केली आहे.