बोली लावल्यानंतर ‘टाटा समूहा’कडून जोरदार प्रयत्न – येत्या डिसेंबरपर्यंत विक्री प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रचंड आर्थिक तोटय़ात असलेल्या ‘एअर इंडिया’च्या विक्रीची प्रक्रिया सध्या गतिमान झाली आहे. 15 सप्टेंबर ही खरेदी करण्याची इच्छा असलेल्या कंपन्यांसाठी बोली लावण्याची शेवटची तारीख होती. टाटा ग्रुप आणि स्पाईस एअरलाइन्सने त्यासाठी बोली लावली आहे. जर सर्व काही ठीक झाले, तर एअर इंडिया विकण्याची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होऊ शकते.
‘एअर इंडिया’ला बोली लावण्यासाठी सरकारशी अनेक कंपन्यांनी संपर्क साधला असून ज्यामध्ये सर्वात मोठे नाव टाटा ग्रुपचे आहे. टाटांसोबत स्पाइसजेटचे अध्यक्ष अजय सिंह यांनीही बोली लावली आहे. जर टाटा समूहाने एअर इंडिया खरेदी केली तर 68 वर्षांनंतर टाटा पुन्हा एअर इंडियाचे मालक बनणार असल्याची चर्चा सध्या औद्योगिक विश्वात सुरू आहे.
‘एअर इंडिया’च्या विक्रीची चर्चा 2007 पासून सुरू आहे. 2007 मध्ये सरकारने एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सचे विलीनीकरण केले. इंधनाचे वाढते दर, खासगी विमान कंपन्यांमधील वाढतील स्पर्धा हे कारण सरकारने पुढे केले. एअर इंडिया 2000 ते 2006 पर्यंत नफा कमवत होती, पण विलीनीकरणानंतर आर्थिक ताण वाढला. कंपनीचे उत्पन्न कमी होत गेले आणि कर्ज वाढत गेले. 31 मार्च 2019 पर्यंत कंपनीवर 60 हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज होते. तसेच 2020-21 या आर्थिक वर्षासाठी विमान कंपनीला आणखी 9 हजार कोटींचा तोटा होऊ शकतो असा अंदाज होता.
यापूर्वीही विक्रीचा प्रयत्न...
2018 मध्ये सरकारने एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीची तयारी केली होती. सरकार एअर इंडियातील आपला 76 टक्के हिस्सा विकेल असा निर्णय घेण्यात आला. यासाठी कंपन्यांकडून एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) मागवण्यात आले. सबमिशनची शेवटची तारीख 31 मार्च 2018 होती, परंतु निर्धारित तारखेपर्यंत एकाही कंपनीने सरकारकडे ईओआय सादर केले नव्हते.
प्रक्रिया ‘कोरोना लॉकडाऊन’च्या विळख्यात
एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया जानेवारी 2020 मध्ये नव्याने सुरू करण्यात आली. यावेळी 76 टक्क्मयांऐवजी 100 टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेण्यात आला. कंपन्यांना 17 मार्च 2020 पर्यंत एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट सबमिट करण्यास सांगितले होते, परंतु कोरोनामुळे विमान उद्योगावर वाईट परिणाम झाल्यामुळे तारीख अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आणि शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 ठेवण्यात आली होती. जर टाटा समूहाची बोली यशस्वी झाली, तर ‘टाटा’ हे नाव 67 वर्षानंतर एअर इंडियामध्ये परतणार आहे.
एअर इंडियाची आतापर्यंतची झेप…
1932 ः जेआरडी टाटा यांच्याकडून टाटा एअरलाईन्सची स्थापना
1946 ः टाटा एअरलाईन्सचे नाव बदलून ‘एअर इंडिया’ असे केले
1948 ः 8 जून रोजी मुंबई ते लंडन हे पहिले आंतरराष्ट्रीय उड्डाण
1953 ः सरकारने देशातील सर्व विमान कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले
1954 ः टोकियो, बँकॉक, सिंगापूर, हाँगकाँग या फेऱयांना प्रारंभ
1962 ः जगातील पहिली ‘ऑल-जेट’ म्हणून एअर इंडिया सन्मान
1997 ः स्वतःची वेबसाईट लॉन्च करत एअर इंडिया झाली ऑनलाईन
2005 ः ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ या लो कॉस्ट एअरलाईन्सचा प्रारंभ
2007 ः ‘इंडियन एअरलाईन्स’ आणि ‘एअर इंडिया’चे विलीनीकरण
2012 ः नुकसानीमुळे देशातील हवाई कंपन्यांमध्ये चौथ्या स्थानी घसरण
2018 ः एअर इंडियाचा 76 टक्के हिस्सा विक्रीची सरकारकडून घोषणा
2020 ः सुधारित नियोजनानुसार 100 टक्के हिस्सा विक्रीची प्रक्रिया सुरू