116 भारतीयांसह 20वी तुकडी जेद्दाहला रवाना
वृत्तसंस्था/ खार्तूम
सुदानमध्ये 7 दिवसांसाठी युद्धविराम जाहीर करण्यात आला आहे. दक्षिण सुदानचे राष्ट्राध्यक्ष साल्वा कीर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्यानंतर लष्कर आणि निमलष्करी दलांनी यासाठी तयारी केली. हा युद्धविराम 4 मे ते 11 मे पर्यंत चालेल. दरम्यान, सुदानमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर 20 वी तुकडी मंगळवारी जेद्दाहला रवाना झाली. या बॅचमध्ये 116 भारतीय होते. भारतीय हवाई दलाचे सी-130जे विमान त्यांना घेऊन पोर्ट सुदान येथून रवाना झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले,
खार्तूम शहरातील सद्यस्थिती पाहता भारतीय दुतावास तात्पुरता पोर्ट सुदान येथे हलवण्यात आला आहे. दुसरीकडे, ऑपरेशन कावेरी अंतर्गत, सुदानमधून 328 भारतीयांना घेऊन एक विशेष विमान मंगळवारी रात्री दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. सुदानमधून आतापर्यंत 3,000 हून अधिक भारतीय त्यांच्या मायदेशी परतले आहेत.