नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना यश : 10 हून अधिक नक्षलवादी जखमी
वृत्तसंस्था /नारायणपूर
छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा नक्षलवादी आणि सुरक्षा दलांदरम्यान चकमक झाली आहे. नक्षलग्रस्त भाग नारायणपूर, विजापूर आणि दंतेवाडाच्या सीमेवर जवानांनी 7 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. घटनास्थळावरुन आतापर्यंत 7 नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले आहेत. तीन जिल्ह्यांचे 1 हजार जवान गुरुवारी शोधमोहिमेकरता रवाना झाले होते. यादरम्यान विविध ठिकाणी नक्षलवादी आणि जवानांदरम्यान चकमक झाल्याची माहिती नारायणपूरचे पोलीस अधीक्षक प्रभात कुमार यांनी दिली आहे. नारायणपूर-विजापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती क्षेत्रात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाल्यावर जवानांनी शोधमोहीम हाती घेतली होती. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात अनेक नक्षलवादी मारले गेले आहेत. तर 10-12 नक्षलवादी जखमी झाले असावेत असे सांगण्यात आले. नक्षलवाद्यांच्या मृतदेहासह चकमक स्थळावरून शस्त्रास्त्रs हस्तगत झाली आहेत. तर संबंधित परिसरात अद्याप चकमक सुरू असल्याचे सांगण्यात आले. नारायणपूर, बस्तर आणि दंतेवाडाच्या ट्रायजंक्शनवर ही चकमक झाली. हे ट्रायजंक्शन अबूझमाडच्या जंगलात आहे. महाराष्ट्र आणि छत्तीसगडदरम्यान फैलावलेल्या अबूझमाडमध्ये नक्षलवाद्यांच्या कारवाया प्रामुख्याने दिसून येत आहेत.
नक्षलवादी कमांडर झारखंडमध्ये ठार
झारखंडच्या खुंटी-चाईबासा सीमेवर पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली आहे. या चकमकीत नक्षलवाद्यांचा एरिया कमांडर बुधराम मुंडा मारला गेला. चकमकीनंतर पोलिसांनी तेथे शोधमोहीम हाती घेतली आहे.