वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिवाळीला भारतीयांनी भारतीय उत्पादनांना अधिक पसंती दिली असल्याचे समोर आले आहे. 71 टक्के भारतीयांनी चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकल्याचे कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया टेडर्स म्हणजेच केटच्या अहवालातून दिसून आले आहे.
यामुळे चिनी उत्पादकांचे 40 हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज केटने वर्तवला आहे. भारताच्या चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याच्या आवाहनाला भारतीय ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याची बाबही यावरून स्पष्ट झाली आहे. जी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी समाधान देणारी म्हणता येईल. ‘मेड इन चायना’ टॅगखाली विकल्या जाणाऱया उत्पादनांना भारतीयांनी सपशेल नकार दिला आहे. यासंदर्भात 204 जिह्यात 14000 भारतीयांचे खरेदीचे सर्व्हेक्षण करण्यात आले. पैकी 29 टक्के जणांनी एक किंवा जास्त चिनी उत्पादने खरेदी केल्याचे दिसून आले. 16 टक्के जणांनी जाणूनबुजून चिनी उत्पादने खरेदी करणे नाकारले. परिणामी चिनी कंपन्यांना 40 हजार कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज केटने वर्तवला आहे.