निष्ठावंतांकडून होवू लागली इच्छा व्यक्त
प्रतिनिधी/ सातारा
या कार्यकाळात शेवटच्या वर्षातील काही महिने तर सभापतीपदाची खुर्ची मिळावी अशी इच्छा सातारा विकास आघाडीतील आतापर्यंत अन्याय झालेल्यांची आहे. सध्या भाजपाच्या नगरसेविका सिद्धी पवार यांनी जिल्हाधिकाऱयांकडे राजीनामा दिला आहे. तो अद्यापही पालिकेत नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याकडे आलेला नाही. त्यामुळे राजीनामा मंजूर झाला की नाही याबाबत अजूनही उलटसुलट चर्चा सुरु आहेत. दरम्यान, त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर नवीन कोणाला संधी दिली जाणार याकडेही सातारा विकास आघाडीमध्येच जोरदार चर्चा सुरु आहे.
सातारा पालिकेत साविआमध्ये कुरघेडय़ाचे राजकारण सातत्याने रंगते आहे. भाजपामध्ये दोन गट आहेत. जरी एकत्रच भाजपाचे नगरसेवक असले तरीही त्यांच्यामध्ये विभीन्न मतप्रवाह आहेत. त्यात काहीजण राष्ट्रवादीच्याही विचाराचे आहेत तर काहीजण दोन्ही राजांच्या विचारांचे आहेत. नगरविकास आघाडीचे नगरसेवक हे नेत्यांच्या विचारांनेच पालिकेत कार्य करतात. परंतु सातारा विकास आघाडीमध्येच सगळी दहिमिसळ झालेली आहे. दोन ते तीन नगरसेवकांचा एक गट तर काहीजणांची स्वतंत्र विचारधारा आहे. त्यामुळे काहीजण काडय़ा टाकून खेळ बघण्यात दंग असतात. आघाडीचे नेते खासदार उदयनराजे यांच्यापर्यंत या सर्व बाबी गेलेल्या असतात. नेत्यांनी कितीही कान पकडले, शिक्षा केली तरीही त्यांच्या चुका ह्या होत असतात. अशा अनेक चुका काही नगरसेवकांच्याकडून होत असतात. तर काही निष्ठावंत नगरसेवक मात्र खासदार उदयनराजेंसाठीच तन,मन,धनाने कार्य करत राहतात. जसे बापू औताडे हे काम करत होते. नुकताच भाजपाच्या नगरसेविका सिद्धी पवार यांनी जिल्हाधिकाऱयांकडे राजीनामा दिला गेला आहे. त्यांनी पदावर बसल्यानंतर आक्रमक स्टाईल वापरत सत्तेतल्याच साविआच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांच्यावर निशाणा साधायला सुरुवात केली. त्यास कीह ब्रेक लागत नव्हता. पत्रकबाजी आरोपबाजी त्त्यंच्याकडून सुरच होती. अगदी जिल्हाधिकाऱयांकडे राजीनामा देतानाही त्यांनी टीप्पणी केली. त्यांचा राजीनामा अजूनही पालिकेकडे आला नसल्याचे समजते. त्यामुळे त्यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर आघाडीचे नेते नेमके कोणाला संधी देणार याकडे सगळय़ांच्या नजरा लागुन राहिल्या आहेत.
आघाडीतले काहीजण राष्ट्रवादीच्या संपर्कात
येवू घातलेल्या पालिकेच्या निवडणूकीत दोन्ही राजेंच्या आघाडय़ांचे पॅनेल असणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे पॅनेल आमदार शशिकांत शिंदे हे पॅनेल टाकणार असल्याने भाजपाचे नगरसेवक, नगरविकास आघाडी आणि सातारा विकास आघाडीतील काही नगरसेवकांची राष्ट्रवादीशी, आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी सलगी वाढली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला सातारा शहरात बळकटी मिळण्याची शक्यता वाढली आहे.