प्रतिनिधी/ सातारा
सातारचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ हा शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचे काम करतो आहे. असा अधिकारी आपल्या जिह्यात नको आहे. त्याची तात्काळ बदली करण्यात यावी किंवा त्यास निलंबीत करण्यात यावे, असा ठराव जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत मांडला. दरम्यान, रिपाइंच्या गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी जिल्हा परिषदेच्या बाहेर गटशिक्षणाधिकारी धुमाळ याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली व उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेत कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित होते. या सभेत इतर विभागांचा आढावा घेतल्यानंतर शिक्षण विभागाच्या आढाव्या वेळी दीपक पवार यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांना विचारणा केली की गटशिक्षणाधिकाऱयांनी केलेल्या कृत्याबाबत नेमके काय कार्यवाही केली?, त्यावर शिक्षणाधिकाऱयांनी शासनास अहवाल सादर केला आहे. कारवाईचे आधिकार आम्हाला नाहीत. शासनाला कळवले आहे, असे सांगताच दीपक पवार यांनी संबंधित गटशिक्षणाधिकाऱयांची घाण सातारा जिह्यात नको आहे. त्यास निलंबीत करण्याचा ठराव घ्यावा, तसेच त्याची लगेच बदली अन्य जिह्यात करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात यावा, अशी मागणी केली. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या बाहेर रिपाइंच्या गवई गटाचे जिल्हाध्यक्ष संजय गाडे यांनी गटशिक्षणाधिकाऱयांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच त्या महिला शिक्षिकेने अर्ज करुनही सहा महिने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे दिरंगाई करणाऱयांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.