वाळपईत गाडे व्यावसायिकांवर कोसळले आभाळ, कोवीडमुळे बुडाला रोजंदारीचा व्यवसाय
प्रतिनिधी /वाळपई
कोरोनामुळे गेली दीड वर्षे माणसांवर अनेक प्रकारची संकटे आली आहेत. जगाव कसं कसं हेच कळेनासे झाले आहे. जे सरकारी खात्यात, खाजगी कंपनीत कायम तत्वावर आहेत. त्यांना कोरोनामुळे झळ बसलेली नाही. परंतु जे रोजंदारीवर व्यवसाय करुन दररोजच्या रोजीरोटीची आपल्या कुटूंबीयांसाठी व्यवस्था करीत होते. अशा व्यावसायिकांवर मात्र मोठे आभाळ कोसळले आहे. वाळपई येथे वाळपई नगरपालिकेच्या भाजी मार्केटच्या समोरील आवारात सायंकाळच्या वेळेत जे गाडे धारक व्यावसायिक रात्री पर्यंत लहानसा व्यवसाय करीत होते. अशांवर पण बेकारीची मोठी समस्या निर्माण झालेली आहे. वाळपईतील हे गाडे गेली दोन तीन महिने बंद स्थितीत आहेत. सायंकाळी चार ते रात्री नऊ दहा वाजे पर्यंत गाडे धारक वडापाव, मिरची, कांदा भजी, अंडा आम्लेट पाव, भेलपुरी, पानीपुरी अशा पदार्थांची विक्री करुन पोट भरत होते. पण कोवीडच्या निर्बंधांमुळे सायंकाळी गाडे सुरु करता येत नाही अशी बिकट परिस्थिती बनली आहे. कोरोनामुळे गेला महिनाभर संचार बंदीचा खेळ सुरु आहे. सकाळ पासुन दुपार पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. पण अशा गाडे धारकांच्या पोटापाण्याचे काय ? हा प्रश्न पडला आहे. त्यांना मात्र गाडा सुरु करता येत नाही. दररोज या गाडे दुकानांवर लोकांची खाद्य मेजवानीसाठी गर्दी पडत होती. वडापाव, मिरची, कांदा भजी, बटाटा काप अशा खमंग पदार्थांची चव न्यारीच होती. पण ती चव गेले तीन महिने चाखता येईना अशी स्थिती आहे. त्यामुळे गाडे धारकां समोर मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मोडला आमचा व्यवसाय तरीही धैर्याने जग म्हणा असे म्हटले तर नवलंच. कोवीडमुळे रोजंदारीचे पुर्ण आर्थीक घडी विस्कटलेली आहे. वाळपईत गेली दहा वर्षे भेलपुरी, पानीपुरी विक्री करणारे उत्तर प्रदेश वाराणसीतील अखिलेश मौर्या म्हणाले सद्या आपण उत्तर प्रदेशात मुळ घरी आलो आहे. वाळपईत आपण भेलपुरी विक्रीचा व्यवसाय करीत आलो आहे. त्यातुन अनेक माणसे जोडली गेली. भाडय़ाच्या घरात थांबून व्यवसाय करीत होते. परंतु कोवीडच्या बंधनामुळे गाडा चालविणे बंदच झाले. परिणामी कुटूंबियांना घेऊन घरचा रस्ता धरण्याची पाळी आपल्यावर आली. सोबत दोघेजण सहकारी कामगार होते. त्यांना महिना पगार दिला जायचा. व त्यातून मिळत असलेल्या नफ्यातून आपण कुटूंब चालवित होतो. गाडा बंद असल्याने कमाई बंद झाली. व आता असलेल्या कमाईतून मुळगावी कुटूंबाची रोजची गुजराण करीत आहे असे मौर्या म्हणाले.
आम्हीच कोणाचे घोडे मारले ?
सरकारने संचार बंदी लागू करुन कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य पाऊल उचलेले होते. परंतु कालांतराने संचार बंदीत शिथीलता लागू करुन सकाळी, दुपारी दुकाने सुरु ठेवण्याची संमती दिली. व हा हा म्हणाता लोकांची गर्दी वाळपईतील बाजारात होते आहे. अन्य दुकाने सुरु मात्र सायंकाळीच गाडे चालविता येत नसल्याने आम्हीच कुणाचे घोडे मारले अशा सवाल आता उपस्थित होतो आहे. सकाळी, दुपारी दुकाने सुरु ठेवल्यास कोरोना येत नाही. पण सायंकाळी गाडे चालविले तर कोरोनाचा प्रसार होतो काय ? असा नाराजाचा सुर व्यावसायिकांकडून व्यक्त होत आहे.