जनसुनावणीवर आप ची जोरदार टीका
प्रतिनिधी / पणजी
घाईगडबडीत व प्रतिकूल परिस्थितीत घेण्यात आलेल्या सीझेडएमपी जनसुनावणीवर आम आदमी पक्षाने जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर सुनावणी स्थगित ठेवण्याची मागणी करूनसुद्धा सरकारने ऐकले नाही व सुनावणी चालूच ठेवली असा आरोपही केला आहे.
आम आदमीच्या नेत्या सिसिल रॉड्रिगीश यांनी बोलताना किनारी भागातील मुद्दे मांडण्याची गरज असतानाही ते मांडू दिले नाहीत, असा दावा केला आहे. बंदराची मर्यादा राजभवनपर्यंत दाखविण्यात आली आहे व त्या पट्टय़ात मच्छिमार लोकांची असंख्य घरे आहेत. अशावेळी या आराखडय़ास मान्यता दिल्यास या समुदायाचा नाश तर होईलच, त्याशिवाय समुद्री पटटय़ाचे सौंदर्यही नष्ट होणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
वाल्मिकी नाईक यांनी बोलताना, राज्यात सध्या कोविडचा प्रभाव कायम असताना एवढय़ा मोठय़ा प्रमाणात लोकांना एकत्र आणणे योग्य नव्हते. भरीस पावसामुळे सर्वांचेच प्रचंड हाल होत आहेत, लोकांना येण्या-जाण्यास त्रास होत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे ही सुनावणी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी न घेता कामाच्या दिवशी ठरविण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांना त्यात सहभागी होता आले नाही, अशा अनेक उणीवा नाईक यांनी निदर्शनास आणल्या. राज्यातील मच्छिमार समुदायाचे रक्षण होणे आणि अस्तित्व टिकणे फार महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
सुनावणीसाठी आलेले लोक रांगेत उभे आहेत, त्यांना आत प्रवेश मिळालेला नाही, हे माहीत असूनही सुनावणी सुरू करण्यात आली. त्यामुळे तेथील महत्वाचे मुद्दे ऐकणे त्यांना शक्य झाले नाही. अनेक लोक बाहेरच वाट पहात थांबले. हा प्रकार म्हणजे भाजपने केलेला लोकांचा छळ आहे. ही सुनावणी प्रक्रिया पूर्णतः त्रुटींनी भरलेली होती, असा आरोप मान्युएल कार्दोजो यांनी केला.
जनसुनावणीच्या नावाखाली चाललेली ही प्रक्रिया सर्व नियमांचे उल्लंघन करणारी होती. जनतेच्या सहभागाशिवाय सुनावणी सुरू करणे चुकीचे होते. अनेक वृद्ध महिला, ज्येष्ठ नागरिक रांगेत होते. परंतु त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. कोविड प्रोटोकॉलचे पालन न करणे, सरकारकडून अधिकारांचा गैरवापर होणे, हे सर्व प्रकार पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या एकूण हेतूचेच उल्लंघन करणारे आहे, अशी टीका सहसंयोजक वेंझी व्हिएगस यांनी केली आहे.