हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी : मोसमातील एकूण पाऊस झाला 55 इंच
प्रतिनिधी /पणजी
सलग चौथ्या दिवशी काल बुधवारीही पावसाने राज्याला झोडपून काढले. राज्यातील नद्या, नाले व धरणेही तुडुंब भरून वाहू लागली आहेत. पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. दि. 17 जुलैपर्यंत राज्यात पावसाचे धुमशान चालणार आहे. गेल्या 24 तासात राज्यात सरासरी 4 इंच पाऊस पडला असून पणजीत सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या दरम्यान दीड इंच पावसाची नोंद झाली. मौसमातील पाऊस 55 इंच झाला असून सरासरीपेक्षा तो 6 इंच जादा आहे.
राज्याला सलग चौथ्या दिवशी पावसाने झोडपून काढल्याने जनजीवनावर विपरित परिणाम झाला. पावसाबरोबरच जोरदार वारे देखील वहात असल्याने मान्सून जास्त आक्रमक झाल्याचे दिसून येते. हवामान खात्याने पुढील 4 दिवसांकरिता ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दि. 17 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस कोसळत रहाणार असे म्हटले आहे.
बहुतांश धरणे ‘ओव्हर फ्ला’
मुसळधार पावसामुळे बहुतांश धरणे भरलेली आहेत. अंजुणे धरणात आता मुबलक पाणीसाठा जमला आहे. धरणामध्ये पाणी येण्याचे प्रमाण जलदगतीने वाढत आहे. आजपासून मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळी वारे वहाण्याचा इशारा हवामान खात्याने दिला असून मुरगाव बंदरात 3 नंबरचा बावटा लावण्यात आलेला आहे. वाऱयाचा वेग ताशी 55 कि. मी. चा राहील, असे कळविले आहे.
पेडणेत वाटचाल शतकाच्या दिशेने
गेले दोन वर्षे सर्वाधिक पावसाची नोंद पेडणेमध्ये होत आहे. कैक वर्षांपूर्वी सत्तरी प्रथम क्रमांकावर असायची. त्यानंतर सांगे प्रथम क्रमांकावर गेले. आता दोन वर्षे पेडणे केंद्राने सर्वांनाच मागे टाकले. पेडणेत यंदाच्या मौसमात आतापर्यंत 87 इंच एवढी विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे. म्हापसा केंद्रात 66 इंच, पणजीत 57.38 इंच, जुने गोवे 60 इंच, सांखळी 60 इंच, वाळपई 62.61 इंच, काणकोण 52.30, दाबोळी 49.58 इंच, मडगाव 48 इंच, मुरगाव 48 इंच, केपे 65 इंच व सांगे 58 इंच एवढी पावसाची नोंद झालेली आहे. फोंडा केंद्रातील पावसाची नोंद करणारी व्यक्ती आजारी असल्याने तेथील नोंद उपलब्ध झालेली नाही.