टिळकवाडी, शहापूर, शिवाजीनगर, बाजारपेठ येथील भंगीबोळांमध्ये अतिक्रमण : महापालिकेच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील बहुतांश भंगीबोळांतील अतिक्रमण हटविण्याची कारवाई महापालिकेच्यावतीने राबविण्यात आली होती. काही भंगीबोळात पेव्हर ब्लॉक घालून रस्ते करण्यात आले आहेत. मात्र, भंगीबोळांची स्थिती आता जैसे थे झाली असून काही ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. काही ठिकाणी भंगीबोळांची दुरवस्था झाली असल्याने अस्तित्वच धोक्यात आले आहे.
अतिक्रमणामुळे शहरातील भंगीबोळांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. विशेषतः टिळकवाडी, शहापूर, शिवाजीनगर, बाजारपेठ परिसरातील भंगीबोळांमध्ये अतिक्रमण झाले असल्याच्या तक्रारी होत असतात. टिळकवाडी परिसरातील भंगीबोळांतील अतिक्रमणाकडे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने कानाडोळा केला असल्याने भंगीबोळात कचऱयाचे ढिगारे साचले आहेत. जुन्या इमारतींची माती, बांधकाम साहित्य टाकण्यात येत असल्याने भंगीबोळांतील रस्ते बंद झाले आहेत. बहुतांश ठिकाणी कचरा टाकण्यात येत असल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भंगीबोळांतील गटारी स्वच्छ केल्या जात नसल्याने दुर्गंधीच्या समस्येत आणखीनच भर पडली आहे. टिळकवाडी, आगरकर रोड येथील भंगीबोळामध्ये पेव्हर्स ब्लॉक घालून रस्ता करण्यात आला होता. पण एका बहुमजली इमारतीच्या बांधकामावेळी महापालिकेच्यावतीने घालण्यात आलेल्या पेव्हर्स ब्लॉकचे नुकसान झाले आहे. रस्त्याची दुरवस्था झाली असून या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
डुकरांचा वावर वाढला
भंगीबोळात कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याने या ठिकाणी डुकरांचा वावर वाढला आहे. प्रत्येक भंगीबोळात डुकरांचे कळप वास्तव्यास असल्याने याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. यामुळे डासांचा उपद्रवही वाढला असून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच भंगीबोळातील स्वच्छता केली जात नसल्याने झाडेझुडपे आणि रान उगवले आहे. परिणामी सापाकिडय़ांचे वास्तव्य वाढले आहे.