प्रतिनिधी /पणजी
माजी केंद्रीय मंत्री व मांद्रे मतदारासंघातून 5 वेळा विजयी झालेले ऍड. रमाकांत खलप हे मांद्रे मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढविणार अशी चिन्हे आहेत.
सध्या भाई खलप यांच्या कार्यकर्त्यांनी खलप यांना निवडणुकीस उभे रहा, असा आग्रह धरलेला आहे. या संदर्भात भाई खलप यांच्याशी संपर्क साधला असता कार्यकर्त्यांनी जोरदार आग्रह धरलेला आहे. आपण अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र पक्षानेदेखील आपल्याला विचारणा केलेली आहे. कार्यकर्त्यांना विचारात घेऊनच आपण पुढील पावले उचलणार, असे ते म्हणाले. आपला निर्णय 15 ऑगस्टपर्यंत होईल. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सारासार विचार केला पाहिजे. त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्या जातील, असे भाई खलप म्हणाले.
खलप हे मांद्रेमध्ये काँग्रेस पक्षतर्फे उभे राहिले तर निवडणुकीत खऱया अर्थाने रंग चढणार आहे. भाजपमध्ये होणारी संभाव्य बंडखोरी तसेच मगो-आपची संभाव्य युती आणि काँग्रेस आघाडी अशी तिरंगी लढत फारच रंगणार आहे. या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाहीत. पार्सेकर यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, यावेळी पार्सेकर यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे. नाहीतर पक्षाला त्याचे परिणाम भोगावे लागतील.
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार, भाजपच्या राज्य पातळीवरील वरिष्ठ नेत्यांचा विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांनाच पाठिंबा आहे व त्यांनी सोपटे यांना तुमचे काम चालूच असे सांगितले असून उमेदवारीचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. खलप यांच्या संभाव्य निर्णयाने मात्र मांद्रेत रंग चढणार आहे.