2,239 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण : निकालाला आक्षेप असणाऱयांसाठी ऑगस्टच्या तिसऱया आठवडय़ात परीक्षा
प्रतिनिधी /बेंगळूर
कोरोना परिस्थितीमुळे यंदा राज्यातील बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय उत्तीर्ण करण्यात आले असून मंगळवारी निकाल जाहीर करण्यात आला. राज्यातील 2,239 विद्यार्थ्यांना 600 पैकी 600 गुण मिळाले आहेत. यामध्ये मंगळूर जिल्हय़ातील अधिक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. निकालाला आक्षेप असणाऱया विद्यार्थ्यांसाठी ऑगस्टच्या तिसऱया आठवडय़ात परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 30 जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी बेंगळूरच्या मल्लेश्वरम येथे पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन बारावीचा निकाल जाहीर केला आहे. दहावी, अकरावी परीक्षेतील गुण आणि बारावीत शैक्षणिक उपक्रमांच्या आधारे मिळालेले गुण यांच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आला आहे. रिपिटर्स विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असणारे किमान गुण आणि 5 ग्रेस मार्क देऊन उत्तीर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
परीक्षेसाठी यंदा एकूण 6,66,497 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये 3,35,138 विद्यार्थी तर 3,31,359 विद्यार्थिनींचा समावेश आहे. ग्रामीण भागातून 1,47,594 तर शहरी भागातून 5,18,903 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. 7 विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल 23 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे पदवीपूर्व शिक्षण खात्याने सांगितले आहे. कला शाखेतील 18 तर वाणिज्य शाखेतील 292 आणि विज्ञान शाखेतील 1,929 विद्यार्थ्यांना 600 पैकी 600 गुण मिळाले आहेत.
मंगळूर जिल्हा आघाडीवर
पदवीपूर्व शिक्षण खात्याने यंदा टॉपर्स विद्यार्थ्यांची यादी जाहीर केलेली नाही. बारावी निकालात राज्यात मंगळूर जिल्हय़ाने आघाडी घेतली आहे. या जिल्हय़ातील 445 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. दुसऱया स्थानावर बेंगळूर दक्षिण जिल्हा असून येथील 302 विद्यार्थ्यांना 600 गुण मिळाले आहेत. तसेच बेंगळूर उत्तर जिल्हय़ातील 261, उडुपी जिल्हय़ातील 149 आणि हासन जिल्हय़ातील 104 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळविले असून हे जिल्हे निकालात अनुक्रमे तिसऱया, चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.
2020-21 या शैक्षणिक वर्षातील बारावीची परीक्षा 24 मे ते 16 जून या कालावधीत घेण्यात येणार होती. मात्र, कोरोना परिस्थितीमुळे परीक्षेशिवाय सर्वच प्रेशर्स आणि रिपिटर्स विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. या विद्यार्थ्यांचा निकाल कोणत्या पद्धतीने तयार करावा, हे निश्चित करण्यासाठी 12 तज्ञांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने 22 जून रोजी आपला अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार निःपक्षपातीपणे निकाल तयार करण्यात आला आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
30 जुलैपर्यंत मुदत…
बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठी राज्य सरकारने निकष ठरविले होते. त्यानुसार प्रेशर्स आणि रिपिटर्स विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकाल मान्य नाही किंवा आक्षेप असतील तर त्यांच्यासाठी 19 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना विनाशुल्क नोंदणीसाठी 30 जुलैपर्यंत मुदत असणार आहे. तसेच बहिस्थ (एक्स्टर्नल) विद्यार्थ्यांनी याआधीच परीक्षेची नोंदणी केलेली असल्याने त्यांना नव्याने नोंदणी करण्याची गरज असणार नाही.
परीक्षेचे वेळापत्रक…
- 19 ऑगस्ट ऐच्छिक कन्नड, बेसिक मॅथ्स
- 21 ऑगस्ट कन्नड
- 23 ऑगस्ट जीओग्राफी, सायकॉलॉजी, फिजिक्स
- 24 ऑगस्ट इंग्लिश
- 25 ऑगस्ट अकौंटन्सी, जीओलॉजी, एज्युकेशन, होम सायन्स
- 27 ऑगस्ट हिस्ट्री, स्टॅटिस्टिक्स
- 30 ऑगस्ट इकॉनॉमिक्स
- 31 ऑगस्ट उर्दु, संस्कृत
- 1 सप्टेंबर.. सोशिऑलॉजी, बायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कर्नाटक-हिंदुस्तानी संगीत
- 2 सप्टेंबर.. लॉजिक, बिझनेस स्टडीज, केमिस्ट्री
- 3 सप्टेंबर……. हिंदी
सर्वच विद्यार्थ्यांना पदवीसाठी प्रवेश
बारावीचे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने त्यांना पदवी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी व्यवस्था करण्यात येत आहे. याविषयी उच्च शिक्षणमंत्र्यांनीही ठोस आश्वासन दिले आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला पदवी शिक्षणासाठी प्रवेश मिळण्यात अडथळे येणार नाहीत, यासाठी उपाययोजना केल्या आहेत.
– एस. सुरेशकुमार, प्राथमिक-माध्यमिक शिक्षणमंत्री
शाखानिहाय निकाल
शाखा | नोंदणी केलेले | विशेष श्रेणी | प्रथम श्रेणी | द्वितीय श्रेणी | तृतीय श्रेणी |
कला | 1,95,034 | 5,974 | 8,61,13 | 74,199 | 28,826 |
वाणिज्य | 2,51,686 | 22,479 | 2,46,908 | 55,825 | 26,471 |
विज्ञान | 2,19,777 | 67,175 | 1,22,057 | 17,111 | 13,432 |
एकूण | 6,66,497 | 95,628 | 3,55,078 | 1,47,055 | 68,729 |
निकाल मागील वर्षाच्या तुलनेत
श्रेणी | वर्ष 2021 | वर्ष 2020 |
विशेष श्रेणीत उत्तीर्ण | 95,628 | 68,866 |
प्रथम श्रेणीत उत्तीर्ण | 3,55,078 | 2,21,866 |
द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण | 1,47,055 | 77,455 |
तृतीय श्रेणीत उत्तीर्ण | 68,729 | 49,110 |
निकाल राखून ठेवलेले | 7 | —— |
एकूण | 6,66,497 | 4,17,297 |