माझी भूमिका युपी, बिहाऱयांना समजली पण भाजपला नाही असे वक्तव्य करून राज ठाकरे यांनी आपण बदलणार नाही हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे युती कोणाला हवी आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुका आल्या की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका काय असणार, त्यांची युती कोणाशी होणार याबाबत चर्चा उठते. सध्या फेब्रुवारीमध्ये होऊ घातलेल्या राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी आधी ठाणे नंतर नाशिक आणि आता पुणे येथे कार्यकर्त्यांची चर्चा सुरू केली आहे. लॉकडाऊनमध्ये अंतर पडल्यानंतर प्रथमच राज ठाकरे थेट कार्यकर्त्यांना भिडत आहेत. नाशिकची जबाबदारी पुत्र अमित ठाकरे यांच्याकडे सोपवून ते स्वतः पुणे मुक्कामी पोचले आहेत. राज्याच्याच नव्हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हे नसल्याने युती आणि आघाडी हा एक आवश्यक घटक बनला आहे. स्वबळावर लढण्याच्या घोषणा वेळोवेळी झाल्या तरी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी मुंबई महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र येऊन लढवाव्यात यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत. त्यामागे भाजपला तीव्र विरोध करणे आणि राज्य सरकारला बळकटी देण्याचे राजकारण आहे. मात्र एकाकी लढून भाजपलाही हे आव्हान परतवणे शक्मय नाही. मुंबई महापालिकेला त्यांना एक मित्र पक्षाची सक्त आवश्यकता आहे. सेनेबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आली तर दलित मते आणि हिंदी, गुजराती मतांचा लाभ होऊ शकतो तर तिथे कमी होणारी मते भरून काढायची तर मराठी भाषिक मतांची भाजपला आवश्यकता भासणार आहे. ती मते मनसेकडे आहेत. मनसेला मुंबईत पुन्हा मोठे आव्हान निर्माण करायचे आहे. मुंबईत हे आदान-प्रदान होऊ शकते. शिवाय नाशिकमध्ये पुन्हा महापालिकेत वर्चस्व निर्माण करणे आणि दोन नगरसेवक असलेल्या पुण्यामध्ये आपले सदस्य वाढवणे त्यादृष्टीने मनसेला लाभ होऊ शकतो. ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह विविध महापालिकांमध्येही त्याचा लाभ मिळू शकतो. अर्थात प्रत्येकाला एकमेकांची गरज आहे. पण….
2014 ची लोकसभा असो, त्यानंतरची विधानसभा, महापालिका असो किंवा 2019 ची लोकसभा आणि विधानसभा असो. प्रत्येकवेळी मनसेची कोणाशी ना कोणाशी युती होणार असे म्हटले जाते. मात्र प्रत्येकवेळी राष्ट्रीय पक्ष भाजप, काँग्रेस मनसेशी जुळवून घ्यायला नकार देतात. त्यांना परप्रांतियांची मते फारच महत्त्वाची असावीत. त्यामुळेच प्रत्येकवेळी मनसेने आपली भूमिका बदलावी अशी आग्रही मागणी राष्ट्रीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांकडून होत असते. सध्या मनसेची भारतीय जनता पक्षाशी युती होऊ शकते अशा शक्मयता वर्तवल्या जात आहेत. राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका, पक्षाच्या बहुरंगी झेंडय़ाला ‘जय महाराष्ट्र’ करून संपूर्णतः भगव्या रंगाचा आणि राजमुद्रा असलेला ध्वज, हिंदुत्वाचा केलेला स्पष्ट उच्चार, मनसेच्या नेत्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या भाजपशी युती होऊ शकते अशी वर्तवलेली शक्मयता मात्र अंतिम निर्णय राज ठाकरेच घेतील असे सांगून निर्माण केलेला सस्पेन्स, त्याला भाजपकडून वेळोवेळी दिलेली हवा त्यामुळे आता मनसेशी भाजप जुळवून घेणार आणि मुंबई, ठाणे आसपासच्या सर्व महानगरपालिकांमध्ये मराठी मतांमध्ये फूट पाडून शिवसेनेला मागे ढकलणार, या शक्मयतांवर चर्चा सुरू झाली आहे. अर्थात भाजप असो की काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना पक्षाच्या मुंबई शाखेच्या दबावापोटी हिंदी व अन्य भाषिक मतांची जपणूक अधिक करावी लागते. मुंबई काँग्रेस आणि मुंबई भाजपचा त्या बाबतीतला दबाव सर्वश्रुतच आहे. त्यामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी नाशिकमध्ये भर रस्त्यात उभे राहून राज ठाकरे यांच्याशी संवाद साधला. मात्र परप्रांतियांबद्दलची भूमिका बदलल्याशिवाय त्यांच्यासोबत जाण्याचा भाजप विचार करू शकत नाही असे स्पष्ट केले. राज ठाकरे आणि त्यांच्यामध्ये झालेल्या चर्चेत हिंदी भाषिकांसमोर ठाकरे यांनी मांडलेली भूमिका आणि त्याची व्हीडिओ क्लिप याबद्दल चर्चा झाली असावी. त्या भाषणाची क्लिप आपण पाठवू असे ठाकरेंनी सांगितले होते. मात्र पाठवली नाही. ती इतर कोणाकडून तरी चंद्रकांतदादा यांना मिळाली आहे, असे स्पष्टीकरण पुणे येथे राज ठाकरे यांनी देऊ केले. माझी भूमिका युपी बिहारींना समजली, मात्र तुम्हाला नाही. माझा कोणाही व्यक्तीला नव्हे तर त्याच्या भूमिकेला विरोध असतो. पटले तर समर्थन करतो, नाही पटले तर स्पष्टपणे सांगतो असं सांगून राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यापेक्षा भूमिकेत बदल होऊ शकत नाही हेच कळवले आहे. त्यामुळे युती करायची किंवा नाही हे आता भाजपला ठरवायचे आहे. त्यातून युतीची गरज कोणाला आहे, हेही स्पष्ट होणार आहे. राज ठाकरे यांनी त्यांच्या पद्धतीने राजकारण सुरू केले आहे. त्यांचा शब्द अंतिम मानणारे हजारो लोक आहेत. मात्र शॅडो कॅबिनेटसारखा राज्य सरकारवर दबाव वाढवणारा अफलातून प्रयोग टाळेबंदीत नेत्यांच्या आपापसातील मतभेदांमुळे सुरु होऊ शकला नाही. आपल्यापेक्षा कनि÷ कार्यकर्ते शॅडो कॅबिनेटमध्ये आहेत म्हणूनही नेते, उपाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष या प्रयोगाच्या विरोधात राहिले. मात्र त्यावरही मात करत राज ठाकरे यांनी आता थेट पक्षाच्या शाखाध्यक्षांपर्यंत थेट चर्चा सुरू केली आहे. चांगले काम करणाऱया शाखा अध्यक्षांच्या घरी जाण्याचीही तयारी दर्शवली आहे. सामान्य कार्यकर्त्यांना सक्रीय करण्यासाठी त्यांचा हा प्रयोग पुन्हा स्वबळावर लढाईची तयारीही ठरू शकतो.
2014 मध्ये मोदींची स्तुती करूनही त्यांना लाभ झाला नाही. उलट विधानसभेला फिस्कटले तरी सेना भाजप सत्तेत आली. 2019 निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्याशी जुळवून घेतले. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी परप्रांतीय भूमिकेवर खोडा घातला. राष्ट्रवादी लोकसभेची जागा देणार ही चर्चाही थांबली. तरीही आघाडीसाठी त्यांनी ‘लाव रे तो व्हीडिओ’ मोहीम आणि प्रचार सभा गाजवल्या. सर्जिकल स्ट्राईक, बालाकोटमुळे ते प्रयत्न अपयशी ठरले. सोनिया गांधी यांची भेट घेतली मात्र विधानसभेत एकच आमदार आला. याचा अर्थ मनसेला या सर्व ‘अंडरस्टँडिंग’चा लाभ मिळाला नाही. उलट मुंबई महापालिकेत नगरसेवक फुटले. तरीही मनसे हा प्रभावी फॅक्टर ठरतो. त्यामुळे राज ठाकरेंशी जोडून घ्यायचा आणि त्यांनी बदलले पाहिजे असाही आग्रह धरला जातो. मात्र या वास्तवाला स्वीकारून मध्यम मार्ग कुणीही काढू शकलेला नाही.
शिवराज काटकर