मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची सूचना : यल्लापूर, अंकोला तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी
प्रतिनिधी /कारवार
जिल्हय़ात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि काळी, गंगावळी व अघनाशिनी नद्यांना आलेल्या महापुरामुळे शेकडो घरांची हानी झाली आहे. पूर्ण कोसळलेल्या घरांना प्रत्येकी पाच लाख रुपये, भागशः कोसळलेल्या घरांना तीन लाख आणि अल्पप्रमाणात हानी झालेल्या घरांना 50 हजार मंजूर करण्याची सूचना मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी केली.
गुरुवारी त्यांनी यल्लापूर व अंकोला तालुक्यातील पूर व अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या प्रदेशांची पाहणी केली. पुढे त्यांनी अंकोला येथील नाडवर सभागृहात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱयांशी अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बोम्माई पुढे म्हणाले, पुरामुळे अनेकांच्या घरातील साहित्याची हानी झाली आहे. घरगुती साहित्य खरेदी करण्यासाठी दहा हजार रुपये मंजूर करण्याची सूचना जिल्हा प्रशासनाला देऊन ते पुढे म्हणाले, घरगुती साहित्य खरेदी करण्यासाठी यापूर्वीच 3 हजार 800 रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. उरलेले 6,200 रुपये लवकरच मंजूर करण्यात येतील.
केपीसी आणि जिल्हा प्रशासनादरम्यान हवा समन्वय
काळी नदीवरील कद्रा धरणातून एकाचवेळी दोन लाखाहून अधिक क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केल्याने कारवार तालुक्यावर आस्मानी संकट ओढवले आहे. त्यामुळे कद्रा, कोडसळ्ळी, सुपा किंवा जिल्हय़ातील अन्य कोणत्याही धरणातून अतिरिक्त पाणी सोडताना कर्नाटक ऊर्जा महामंडळाच्या अधिकारी आणि जिल्हा प्रशासनादरम्यान समन्वय हवा. टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवल्यास हानीचा प्रश्न निर्माण होणार नाही. यावेळी आमदार रुपाली नाईक, दिनकर शेट्टी, सुनील नाईक, माजी मंत्री शिवराम हेब्बार आदी उपस्थित होते.