मिझोराम पोलिसांकडून अधिक तक्रार नोंद – हत्येच्या प्रयत्नाचा आरोप
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
ईशान्येतील राज्यांदरम्यान सुरू असलेल्या सीमा वादादरम्यान मिझोराम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्याविरोधात एफआयआर नोंदविला आहे. याचबरोबर आसामचे 4 वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच 2 प्रशासकीय अधिकाऱयांच्या समवेत 200 अज्ञात पोलिसांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिझोरामचे पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय) जॉन नेहलिया यांनी या सर्वांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कटासमवेत अनेक आरोपांप्रकरणी गुन्हा नोंदविला गेल्याची माहिती शनिवारी दिली आहे. कोलासिब जिल्हय़ातील वैरेंगटे पोलीस स्थानकात एफआयआर नोंद झाला आहे.
आयजी, डीआयजी विरोधात एफआयआर
आसाम पोलीस विभागाचे महासंचालक अनुराग अग्रवाल, उपमहासंचालक देवज्योति मुखर्जी, कछारचे पोलीस अधीक्षक चंद्रकांत निंबाळकर आणि ढोलई पोलीस स्थानकाचे प्रभारी साहब उद्दीन यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. कछारचे उपायुक्त कीर्ति जल्ली आणि विभागीय वनाधिकारी सनीदेव चौधरी यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत.
मागील आठवडय़ात हिंसाचार दोन्ही राज्यांदरम्यान कित्येक दशकांपासून सीमेवरून वाद सुरू आहे. मागील आठवडय़ात या वादाने हिंसक वळण घेतले आहे. मागील सोमवारी या राज्यांच्या सीमावर्ती भागात हिंसाचार भडकला आणि यात आसामच्या 6 पोलीस कर्मचाऱयांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले होते.