ऑनलाईन/टीम
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्यावर नियंत्रणासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी राज्याच्या सीमेवर सतर्कता बाळगण्याची सूचना केली आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना संसर्ग वाढत असल्याने या राज्यांमधून कर्नाटकात येणाऱयांना ७२ तासांपूर्वी केलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक असणार आहे.
विमान, रेल्वे, बस किंवा खासगी वाहनातून प्रवास करणाऱयांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली असली तरी त्यांना राज्यात प्रवेश करण्याआधी चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे सक्तीचे आहे. त्यामुळे कर्नाटकात प्रवेश करताना कोगनोळी टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यां, कर्नाटकात प्रवेश करताना करोनाचा निगेटिव्ह अहवाल असेल तरच प्रवेश दिला जात आहे. गेले काही दिवस एक लस घेतलेल्या व्यक्तींना प्रवेश दिला जात होता, तो बंद करण्यात आला आहे. लस किंवा आरटीपसीआरचा अहवाल नसल्यास रॅपिड टेस्टची सक्ती करण्यात आल्याने पुणे ते बेंगळूर महामार्गावर वाहनांच्या रांगा दिसत आहेत.
गेले काही दिवस झाले महाराष्ट्रातून कर्नाटकात जाण्यासाठी सतत नियम बदलले जात आहेत. महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग जास्त असल्याने कर्नाटकने प्रवेशासाठी अनेक निर्बंध घातले होते. पहिल्या टप्प्यात करोनाच्या आरटीपीसीआर चाचणीच्या निगेटिव्ह अहवालाची सक्ती करण्यात आली. ते नसेल तर महामार्गावर रॅपिड टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्याचा अहवाल निगेटिव्ह असेल तरच आत प्रवेश दिला जात होता. नंतर गेले काही दिवस एक लस घेतलेल्या व्यक्तीस आत प्रवेश दिला जात होता. मात्र, आजपासून या नियमात बदल करण्यात आला आहे. एक लस घेतलेल्या व्यक्तीला सरसकट प्रवेश नाकारण्यात येत आहे.
कर्नाटकात प्रवेश करताना ‘या’ अटी
केरळ, महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आजपासून करोनाचा ७२ तासातील निगेटिव्ह अहवाल सक्तीचा करण्यात आला आहे. अत्यावश्यक कामासाठी जात असाल तरच रॅपिड टेस्टची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर निर्बंध अधिक कडक केल्याने वाहनधारक व प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करताना कोगनोळी टोल नाक्यावर प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जात आहे. निगेटिव्ह अहवाल असेल तरच पुढे सोडण्यात येत असल्याने पोलिस व प्रवाशी यांच्यात वादावादी सुरू आहे. दिवसभर या नाक्यावर वाहने अडकून पडल्याने दोन ते तीन किलोमीटरच्या रांगा दिसत होत्या.