टोकियो ऑलिम्पिक क्रीडास्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाच्या खेळाडूंबरोबरच मीराबाई चानू, पी व्ही सिंधू, लवलीना बॉर्गोहाईन, रवी कुमार यांनी पदके पटकावून भारतीयांच्या अपेक्षांना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. 40 वर्षांनंतर भारतीय हॉकी संघाने मिळवलेल्या यशाने आनंदात भर घातली आहे. महिला भारतीय हॉकी संघ, बजरंग पुनिया, आदिती अशोक, नीरज चोप्रा, सीमा बिसला यांच्याकडेही देश नजर लावून आहे. पदकांच्या बाबतीत भारत दिवसेंदिवस श्रीमंत होत चालला आहे. यावेळी प्रारंभीच्या काळात सुरू झालेली निराशाजनक स्थिती आणि आता पाच पदकांची बेगमी केल्यानंतर भारतीय मन उल्हासित झाले आहे. पदकांच्या या श्रीमंती आनंदाला मात्र अनेक खेळाडूंच्या शेजारी राहणाऱया काही मंडळींनी गालबोट लावले आहे. सातारा जिह्यात शेजाऱयांच्या त्रासाला कंटाळून तिरंदाज प्रवीण जाधवच्या कुटुंबीयांनी घर आणि गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवीणच्या वडिलांनी आयुष्यभर एका छोटय़ाशा जमिनीवर पाल ठोकून जीवन कंठले. कृषी खात्याच्या ज्या विभागात त्यांनी नोकरी केली तिथली जागा मिळण्याच्या ते आशेवर होते. शासनाने दिलेल्या जागेवर घर बांधत असताना गावातल्या टग्यांनी प्रवीणच्या कुटुंबीयांना धमकावले. जेसीबीने घर पाडण्याचा इशारा दिला. ऑलिम्पिकमध्ये यशस्वी झाला नसला तरी पुढच्या स्पर्धांसाठी प्रवीण राष्ट्रीय अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबीयांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्याला गावी पोहोचता येणार नाही. माध्यमांनी गलबलाट केल्यानंतर पोलीस आणि राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप केला आहे. तरीही प्रवीण जाधवची चिंता मिटली असे म्हणता येणार नाही. असाच प्रकार महिला हॉकी संघाच्या पराभवानंतर हॉकीपटूच्या दारात तिच्या शेजाऱयांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. या कर्मदरिद्रीपणाचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. लंडन ऑलिम्पिकमध्ये पाच पदकांसह भारताने 2012 मध्ये घेतलेल्या भरारीला मागे टाकले जावे यासाठी खेळाडू जीवाचे रान करत आहेत. दुसरीकडे त्यांच्या घरच्यांना नको त्या कटकटींना सामोरे जावे लागत आहे. ही काही संपूर्ण भारतीयांची मानसिकता नसली तरीही जे खेळाडू निश्चिंत मनाने आपला खेळ खेळण्यात व्यग्र असले पाहिजेत त्यांना अशा प्रकारचा त्रास देऊन लोकांना काय मिळते हा प्रश्नच पडतो. बॉक्सिंगमध्ये पदक पटकावलेल्या लवलीनाला आयुष्यभर तिच्या आसपासच्या लोकांकडून बोल ऐकून घ्यावे लागले आहेत. तीन मुलीच झाल्याने आईला आणि त्या मुलींना उत्तेजन देतो म्हणून त्यांच्या पित्यालाही लोकांनी नावे ठेवली. ऐपत नसतानाही पालकांनी चांगले खेळाडू बनवले. सायकलवरून खडतर रस्त्याने कित्येक मैलांचा प्रवास करून लवलीना आणि तिच्या बहिणी खेळत राहिल्या. राष्ट्रीय स्पर्धेत उतरलेल्या लवलीनाला पुरेसे ज्ञान नसतानाही यश मिळाले.
राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात तिला बेसिकपासून शिकवण्याची जबाबदारी प्रशिक्षकांनी पार पाडली आणि आज आसाममधल्या एका खेडय़ातील ही मुलगी भारतीय मुलींच्या आकांक्षांचे प्रतीक बनली आहे. अर्जुन पुरस्काराचे पैसे तिला आपल्या आईच्या किडनीच्या विकारावर खर्च करावे लागले. आजपर्यंत ज्या खडतर वाटेने ती वाटचाल करत होती ती तिच्या गावाकडे आणि घराकडे घेऊन जाणारी वाट आसाम सरकारने युद्धपातळीवर दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले आहे. आता जेव्हा ती पदक घेऊन घरी जाईल तेव्हा गुळगुळीत डांबरी रस्ता तिच्या स्वागताला सज्ज असेल. पण यश मिळाल्यानंतर झालेला हा बदल त्या खेळाडूला मनापासून खरोखरच सुखावून जात असेल का? सर्वसामान्यांच्या जीवनाची फिकीर न करणारे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असे अचानक खडबडून जागे होतात. पण सर्व प्रकारच्या अभावांवर मात करून आयुष्याची लढाई लढणाऱया एखाद्या खेळाडूची किंमत अर्जुन पुरस्कारानेसुद्धा वाढत नाही. तिच्या घरापर्यंत चांगला रस्ता करावा असे कोणाला वाटत नाही. पदक मिळाल्यानंतर माध्यमे जेव्हा तिच्या घरापर्यंत पोहोचली तेव्हा हे वास्तव जगासमोर आले. पी व्ही सिंधूच्या बाबतीत तर आता सर्वत्रच कौतुकाने बोलले जाते. बॅडमिंटनमध्ये सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणाऱया जगातील केवळ चार खेळाडूंमध्ये ती एक आहे. मात्र यापूर्वी जेव्हा तिला यश मिळाले तेव्हा संपूर्ण भारतात गुगलवर लोकांनी सिंधू ची जात कोणती याचा शोध घेतला. भारतीयांच्या या मानसिकतेला गुगलने जोराचा धक्का दिला. जग सिंधूबद्दल काय माहिती घेत होते आणि भारतीय कशाचा शोध घेत होते हे उघड केले. भारतीय हॉकी संघाची कप्तान राणी रामपालच्या आयुष्याची कथा तर फारच विदारक. हरियाणाच्या शहाबादमध्ये घरी वीजही नव्हती. वडिलांचे उत्पन्न जेमतेम रोज ऐंशी रुपये. त्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू शकत नव्हता. मग वडील राणीला हॉकी स्टिक कुठून खरेदी करून देणार? हॉकी मैदानावर राणी कोचना विनवण्या करायची. स्वतःची हॉकीची स्टिक नाही म्हणून बोलायचे. अखेर एक तुटकी स्टिक घेऊन तिने सराव सुरू केला. स्कर्ट घालून खेळायला घरच्यांचा विरोध म्हणून विजारीवर खेळत राहिली आणि तिने आयुष्याची लढाई जिंकली. भारतीय ऑलिम्पिक संघामध्ये असलेल्या प्रत्येक खेळाडूची अशी एक एक कहाणी आहे. पदकांच्या आशेने आपण एखाद्या खेळाडूच्या खेळावर सहज ताशेरे ओढतो. मात्र हे पदक त्यांच्या आयुष्याची झुंज असते. किती मोठय़ा आव्हानांवर मात करून ते मैदानावर खेळायला पोहोचलेले असतात. भारतीय क्रीडा संघटनांच्या राजकारणापासून ते अधिकारी आणि राज्यकर्त्यांच्या वशिलेबाजीपर्यंत अनेक छुप्या आव्हानालाही त्यांना सामोरे जावे लागते. त्यात पुन्हा घराकडे सुरू असलेला संघर्ष वेगळाच. काही खेळाडूंना आपल्या पालकांच्या मृत्युनंतरही घराकडे परतता आले नाही. मुलांच्या आर्त हाकेकडे दुर्लक्ष करून अनेक महिला खेळाडू महिनो न् महिने सराव करत आहेत. काही देशात परत आल्यानंतरही घरी पोहोचू शकणार नाहीत. पण त्यांच्या या सगळय़ा झुंजीला मातीत मिसळण्याचे काम काही घटना करत असतात. किमान त्या थांबल्या तरी भारताने सुवर्ण पदक मिळवले असे म्हणता येईल.
Previous Articleक्षण हे सन्मानाचे…
Next Article बजरंग पुनिया उपांत्य फेरीत पराभूत
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.