बांदा/प्रतिनिधी-
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनसाठी बांदा शहराची निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया इन्स्टिस्ट्युट लोकल सेल्फ ग्रुप कोल्हापूर संस्थेमार्फत सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन गाव आराखडा तयार करणेबाबत बांद्यात भेट देण्यात आली.
स्वच्छ भारत मिशन टप्पा २ अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यासाठी तपशिलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी बांदा शहराची निवड झाली आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने याबाबतचे कार्यारंभ आदेश दिले आहेत.
यासाठी कोल्हापूर येथील संस्थेकडून गावातील शाळा, अंगणवाडी, शासकीय कार्यालय, गृहभेटी स्वच्छतेच्या सुविधा या घटकांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी सरपंच अक्रम खान, सदस्य जावेद खतीब, साई काणेकर, किशोरी बांदेकर, रिया अल्मेडा, समीक्षा सावंत, पंचायत समिती कर्मचारी अविनाश सावंत, संस्था अधिकारी कर्मचारी परिक्षित चिलोडे, सागर कडव, विक्रम काळेभेरे आदी उपस्थित होते.