प्रतिनिधी /बेळगाव
क्रांतीवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या नावे 150 कोटी रुपये खर्चुन सैनिक शाळा उभारण्याचे काम सुरू असून लवकरच या शाळेला प्रारंभ होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.
कुमारगंधर्व रंगमंदिर येथे बसवराज कट्टीमनी सभागृहात रविवारी संगोळ्ळी रायण्णा जयंती कार्यक्रमात बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. कित्तूर संस्थानच्या संरक्षणासाठी संगोळ्ळी रायण्णा यांनी ब्रिटिशांविरुध्द लढा दिला. लढत असतानाच देशासाठी त्यांनी प्राणत्याग केला. स्वातंत्र्य लढय़ात संगोळ्ळी रायण्णा यांचे बलिदान मोठे आहे, असेही ते म्हणाले.
संगोळ्ळी रायण्णा हे नाव जिवंत ठेवण्यासाठी 150 कोटी रुपये खर्च करुन सैनिक शाळा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या वीर योद्धय़ाचे जीवन चरित्र युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे. म्हणून लवकरच ही शाळा सुरु करण्यात येणार आहे, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
आमदार अनिल बेनके यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. प्राचार्य एम. जयाप्पा, जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी दर्शन एच. व्ही. उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी स्वागत केले. सुनिता देसाई यांनी सूत्रसंचालन केले. विद्यावती बजंत्री यांनी आभार मानले.