मुंबई \ ऑनलाईन टीम
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आणि इतर पक्षांचे प्रमुख नेते जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशातील अनेक पक्ष जातनिहाय जनगणना व्हावी अशी मागणी करत असून पंतप्रधान यावर तयार होतील असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला आहे.
नवाब मलिक म्हणाले की, संसदेच्या पटलावर गृहमंत्र्यांनी देशात जनगणना होणार नाही असे स्पष्ट केले आहे. जर देशातून मागणी असेल तर इम्पिरिकल डेटा गोळा करायला मदत होईल. शिवाय ओबीसींचे अनेक प्रश्न त्यामुळे सुटतील असेही नवाब मलिक म्हणाले. मागच्या सरकारनेसुध्दा जातनिहाय जनगणना करण्याचे सुचवले होते याची आठवण देखील त्यांनी यावेळी करून दिली.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. त्यांच्यासोबत एक सर्वदलिय शिष्टमंडळही आहे.कोणत्या जातीचे किती लोक राज्यात आहेत याचा कुठलाही ठोस आकडा हाती नसतानाही, योजना मात्र जातींच्या नावावर दिल्या जातायत. आरक्षणाची घोषणाही कुठल्याही आकडेवारीशिवाय केली जातेय. त्यामुळे योजना, त्यावरचे निर्णय, आरक्षण अशा सगळ्याच गोष्टींमध्ये विरोधाभास होतोय. त्याच पार्श्वभूमीवर जातीनिहाय लोकसंख्या मोजावी अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केलीय.