मुंबई \ ऑनलाईन टीम
आठ महिने उलटून गेले तरी देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्यामुळे यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची विधान परिषदेवर निवड होते. यासाठी महाविकास आघाडी सरकारने ६ नोव्हेंबर २०२० रोजी या १२ नावांची शिफारस राज्यपालांकडे केलेली आहे. मंत्रिमंडळात या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर ही नावे राज्यपालांकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आली आहेत. मात्र, आठ महिने उलटूनही अद्याप निर्णय घेण्यात झालेला नाही.
राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी ३.३० वाजता बैठक होणार आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार आहेत. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकार पुढील रणनीती ठरवणार आहे. त्यानंतर राज्यपालांना भेटणार आहेत. दरम्यान, राजभवनाकडून भेटीची वेळ अद्याप देण्यात आलेली नाही, अशी देखील माहिती आता समोर येत आहे.